आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी : नऊ कर्तृत्ववान महिलांवर आधारित मालिका
वार्ताहर / नेरुर:
सामान्य जनतेमधील ‘नवदुर्गां’चा शोध घेण्यासाठी यावषी श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुपकडून तसेच प्रेम मी मीडिया आणि व्हर्च्युअल व्हेलॉसिटी सॉफ्टवेअर सोल्यूशन यांच्या सहकार्याने व कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला होता. हा उपक्रम ज्या महिलांच्या जीवनावर चित्रित करण्यात आला होता, त्या महिलांचा सत्कार माडय़ाचीवाडी येथील जिव्हाळा आश्रमात प्रतिमा नाटेकर, वैद्य सुविनय दामले व चित्रकार सुनील नांदोस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावर भर देऊन काम करण्यात आले आहे. महिलांना देवी मानल्या जाणाऱया आपल्या समाजातील स्त्रिया आणि त्या करीत असलेल्या त्यांच्या कामाचा गौरव व त्यांच्या कर्तृत्वाचा जागर या मालिकेत करण्यात आला आहे. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हीडिओ स्वरुपात, नऊ वेगवेगळय़ा भागात दाखविले आहे.
यात संगीत शिक्षिका योगिता तांबे या निसर्गातून होणारा नाद आणि त्याला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करीत आहेत. विशेष म्हणजे त्या सत्तरहून अधिक पारंपरिक वाद्ये वाजवतात. गड-किल्ले सर करणाऱया सुवर्णा वायंगणकर गड-किल्ले संवर्धनासाठी नऊवारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृतीही जपत आहेत. माया शृंगारे या आपल्या शेतात रानभाज्या जगवतात आणि त्यांचे संवर्धन करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरुपी रानभाज्या मोफत देतात. सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱया आणि एक स्त्राr असून दशक्रिया विधी करणाऱया श्रद्धा कदम या समाजसेवेचे कार्य करीत आहेत. निसर्ग हाच आपला कॅनव्हास समजून निसर्गातून उपलब्ध झालेल्या साधनांचा वापर करून विविध कलाकृती तयार करणाऱया ऋतिका विजय पालकर या निसर्गाला देव मानून आपली कला सादर करतात. आपल्या रुचकर हाताने भूकेलेल्यांची भूक भागविणाऱया नानी म्हणजे इंद्रायणी गावडे (84) ‘अन्नपूर्णा’ म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील फुगडी हा खेळ मनोरंजन आणि शारीरिक जडण-घडणीसाठी खेळल्या जाणाऱया आणि त्यातून आपली संस्कृती-परंपरा जपणाऱया आरती परब, आपल्या आयुष्याची कळ सोसत आदिवासी कला प्रकार ‘कळसुत्री’ आणि ‘चित्रकथी’ रुपातील बाहुल्यांचे खेळ करून मनोरंजन, समाज प्रबोधन करणाऱया तनुश्री गंगावणे तसेच आपल्या प्रेमाचा जिव्हाळा कायम ठेवत वृद्धाश्रम चालविणाऱया श्रेया बिर्जे.
आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱया या नऊ रणरागिणींच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी ही मालिका तयार करण्यात आली होती. त्याचे दिग्दर्शन सुमित पाटील व किशोर नाईक यांनी केले आहे. छायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव यांनी, तर लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. यात विशेष सहकार्य संकेत कुडाळकर, साक्षी खाडये, धीरज कादवडकर, मंगल राणे, अभिषेक तेंडुलकर, भरत शिंदे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे या सगळय़ा स्त्रियांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीप्ती भागवत, स्पृहा जोशी, तन्वी पालव, ऋतुजा बागवे, सुरूची आडारकर, नयना आपटे, अश्विनी कासार, विमल म्हात्रे, चिन्मयी राघवन यांनी आपला आवाज दिला आहे.
निवेदन नीलेश गुरव यांनी केले, तर आभार सुमित पाटील यांनी मानले.