सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या पूर्वीचे जग आठवते का कोणाला? आजच्या काळात या दोन गोष्टींशिवाय जगाची कल्पना करणे अशक्मयच आहे. इंटरनेट (internet हे international network चे लघुरूप आहे. मराठीत ‘आंतरजाल’) या महासत्तेचा शोध 1960-70 मध्ये लागला. त्या वेळेला फक्त मोठे अधिकारी आणि कार्यालये या सेवेचा उपयोग कार्यालयाच्या कामांसाठी करायचे. व्यावसायिक वापरासाठी इंटरनेटची संकल्पना 1983 साली जनतेच्या परिचयात आली. संगणक शास्त्रज्ञ विन्टन सर्फ आणि बॉब काहन हे या महाशक्तीची निर्मिती करत होते तेव्हा त्यांना कल्पना तरी असेल का, की ही महाशक्ती जगात किती क्रांती घडवणार आहे? 1960 ते 80 पर्यंत फक्त उच्चवर्गीय लोक, राजकारणी आणि पोलीस दल या सेवेचा फायदा घेऊ शकत होते. संगणक उत्पादन उद्योग अजून तितकासा विकसित झाला नसल्याने, सामान्य माणसाला संगणकाची गरजही नव्हती आणि ते परवडणे शक्मयही नव्हते. इथे माणसाच्या बुद्धिमत्तेचे, जिद्दीचे आणि सर्जनशीलतेचे फार कौतुक वाटते. कारण इंटरनेटसारखा अनाकलनीय शोध, ज्याचे कार्य जनतेला अजूनही माहीत नाही, ती शक्ती आज जीवनावश्यक घटक बनून राहिली आहे.
इंटरनेट आणि शिक्षण
माणसाने ज्या गोष्टींचा विचारही केला नसेल, अशा अद्भुत गोष्टी आज इंटरनेटमुळे सहज शक्मय होतात. आज माणूस जगाच्या एका कोपऱयात बसून जगातील सर्व घडामोडींची नुसती माहिती काढत नाही तर साक्षीदार होऊ शकतो. ज्ञानाचा स्रोत आता केवळ छापील पुस्तकेच नसून त्यात ई-बुक्स, ब्लॉग्स, ऑनलाईन बातम्या इत्यादींचीसुद्धा भर पडली आहे. इतकेच काय तर आज पदवी मिळवायला महाविद्यालयात जायची गरज नाही. माणूस आज सहजपणे ऑनलाईन डिप्लोमा मिळवून व्यावसायिक जीवनात पदार्पण करू शकतो. इंटरनेटमुळे प्रत्येकाकडे जणू एक ज्ञानाचा, कलेचा, संपर्क आणि संधीचा, खजिना मिळाला आहे. अशा एका सार्वत्रिक व्यासपीठामुळे पैशांवरून दिले जाणारे प्राधान्य खोडून निघते. कारण, मोठमोठय़ा विद्यालयात प्रवेश मिळवायला माणसाला प्रचंड देणगी द्यायला लागते. बरेचदा ठरावीक फीसुद्धा काही लोकांना परवडत नाही. अशावेळेला, नवनवीन विषयांची माहिती आणि ज्ञान सहजपणे इंटरनेटवर उपलब्ध असते. यामुळे महाविद्यालयांची किंमत किंवा गुणवत्ता कमी होत नाही, पण सामान्य माणसाला त्याच्या इच्छेनुसार शिक्षण प्राप्त करायला इतर पर्याय मिळतात. ते कदाचित महाविद्यालयाच्या शिक्षणाशी बरोबरी करू शकणार नाही, पण त्या सामान्य माणसाच्या कौशल्यामध्ये पात्रता जोडतात आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करतात.
माणूस आणि त्याचे सामाजिक वर्तुळ
पूर्वी लोक नवनवीन कपडे, दागिने घालून, केशरचना बदलून, सार्वजनिक मेळावे, पाटर्य़ा इत्यादी ठिकाणी जायचे. आजच्या काळात, लोक नवनवीन कपडे, दागिने घालतात, केशरचना बदलतात आणि सेल्फी काढून इंटरनेटवर पोस्ट करतात. अशाने आपला संपर्क केवळ आपल्या शहरातील, समाजातील व्यक्तींशी नाही, तर जगातील कोणत्याही माणसाशी होऊ शकतो. संपर्क मर्यादेमुळे पूर्वी ओळखी बनवायला खूप वेळ जायचा. पण आज भारतात बसून लंडन, न्यूयार्क, पॅरिसमध्ये एकाचवेळी संबंध जोडायला एक हाय स्पीड इंटरनेट आणि भ्रमणध्वनी पुरेसा आहे. जगाला एकत्र जोडून ठेवण्याचे काम प्रथम या इंटरनेटनेच केले असावे.
माणूस आणि कला
माणसाचा मेंदू हा क्रांती घडवण्यास सक्षम आहे हे तर सर्वानाच ठाऊक आहे. भाषा निर्मिती व्हायच्या आधीसुद्धा कलेची निर्मिती झाली आहे. कित्येक प्रागैतिहासिक माणसाने गुहेतील केलेली चित्रकला या गोष्टीचा पुरावा आहे. जेव्हा विज्ञान, भूगोल, गणितासारखे मानवनिर्मित विषय विकसित होत होते, त्याबरोबरच कला, चित्रकलेचे साधन आणि संगीतही विकसित होत होते आणि अजूनही होत आहे. पूर्वी कित्येक कलाकारांना आपले संगीत, गायन, नृत्य आणि चित्रकला जनतेपर्यंत पोचवायला गावोगावी फिरावे लागायचे. पण तेच कलाकार आज घर बसल्या जगप्रसिद्ध होऊ शकतात. यामुळे कलाकारांना एक व्यासपीठ तर मिळतेच, पण समाजात विविध कलेचे महत्त्वदेखील पसरते. जगातील काना-कोपऱयातील कलेशी माणूस जोडला जातो आणि प्रत्येक कलेची विशिष्टता पाहून त्याबद्दल कुतूहल आणि कौतुक निर्माण होते. विशेष अधिकार असलेल्या, श्रीमंत, प्रबळ तसेच सर्व वंचित माणसांमधील सामाजिक अंतर अशाने कमी होते. सर्वांना स्वतःला सिद्ध करायला समान संधी देण्याचे खूप महत्त्वाचे काम इंटरनेटने केले आहे.
माणूस आणि सोशल मीडिया
इंटरनेटवर सध्या सर्वात प्रसिद्ध व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया आहे. वर ज्या गोष्टींचा उल्लेख झाला आहे, त्या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे सोशल मीडिया. काय नाही या सोशल मीडियावर? 2600 बी.सी.इ. मधील हडाप्पा संस्कृतीची छायाचित्रासकट माहिती, त्यावरील लिहिली गेलेली पुस्तके व तिथे जाण्याचे साधन पुरवण्यापासून, शाळेतील मैत्रिणीला शोधायला मदत करणारी सर्व साधने सोशल मीडियावर तुम्हाला मिळतील. इंटरनेट आणि सोशल मीडिया जणू सध्याच्या युगाची महासत्ता आहे.
पण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणतात ना, ‘महान सामर्थ्या बरोबर महान जबाबदारीदेखील येते.’ प्रत्येकाला ही शक्ती जपणे व त्याचा योग्य उपयोग करणे जमत नाही आणि इंटरनेटसारख्या महाशक्तीचा गैरवापर केल्यावर त्याचे होणारे दुष्परिणामदेखील आपण सर्वानी अनुभवले आहेत. इंटरनेट ही एक अशी अनाकलनीय शक्ती आहे, जिचा योग्य वापर केला तर माणूस सर्वोत्तम जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. पण, जर त्या शक्तीचा दुरुपयोग होत गेला, तर विध्वंसक ठरू शकतो. पण इंटरनेटच्या क्षमतेमधील ही विध्वंसक बाजू केवळ 20 टक्के आहे. या वर्ल्ड वाईड वेबचे संभाव्य इतके अंतहीन आहे की आपण त्याचा उपयोग समाजाचा उद्धार करायला केला पाहिजे. माणसाचा मेंदू जसा सकारात्मक बदल घडविण्यास सक्षम आहे, तसाच समाज नष्ट करायलादेखील आहे. माणूस हाच माणसाचा सगळय़ात चांगला मित्र आणि सर्वात मोठा शत्रूही होऊ शकतो. तसेच काहीसे नाते इंटरनेट आणि माणसाचे आहे. त्यामुळे आपण समाज म्हणून या इंटरनेट नामक महान सामर्थ्याची योग्य जबाबदारी घेऊन, या वरदानाला शाप बनण्यापासून थांबवले पाहिजे!
श्राव्या माधव कुलकर्णी