पंतप्रधान मोदींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर : जनतेच्या आशीर्वादामुळे कुणी हातसुद्धा लावू शकत नाही, आसामच्या कोक्राझारमध्ये विराट सभा
वृत्तसंस्था/ कोक्राझार
बोडो शांतता करारानंतर पहिल्यांदाच आसाममध्ये पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. काही नेते मला दंडुक्याने मारू पाहत आहेत, पण देशातील माताभगिनींच्या आशीर्वादाने मी वाचणार आहे. अत्यंत मोठय़ा प्रमाणात माताभगिनींकडून सुरक्षा मिळालेल्या मोदीला कुणीच दंडुक्याने मारू शकत नसल्याचे पंतप्रधानांनी शुक्रवारी म्हटले आहे.
एनआरसी, नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी काही जण अफवा पसरवत आहेत. पण देशविरोधी शक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ईशान्येतील जनतेला करू इच्छितो. आसाम शांतता करार ईशान्येच्या लोकांसाठी 21 व्या शतकातील नवा प्रारंभ असल्याचे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कोक्राझारमधील ही सर्वात मोठी राजकीय सभा आहे. स्वतःच्या राजकीय जीवनात अशी सभा अनुभवली नव्हती. देशासाठी बलिदान करणाऱया हजारो हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. राज्यात आता हिंसाचार होणार नसल्याचे मोदींनी म्हटले.
सर्व मागण्यांची पूर्तता
केंद्र, आसाम सरकार आणि बोडो आंदोलनाशी संलग्न संघटनांनी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केल्यावर आता कुठलीच मागणी शिल्लक राहिलेली नाही. केवळ विकासालाच आता प्राधान्य राहणार आहे. या कराराचा बोडो समुदायासह अन्य आदिवासींनाही लाभ होईल. कराराच्या अंतर्गत बोडो प्रादेशिक परिषदेचे अधिकारक्षेत्र वाढविण्यासह त्याचे सबलीकरण करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
आसाम करार
कराराच्या अंतर्गत बीटीएडीमध्ये अंतर्भूत होणाऱया क्षेत्राची सीमा निश्चित करण्यासाठी आयोग स्थापन करण्यात येणार आहे. या क्षेत्राला 1500 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज मिळणार आहे. या निधीचा कोक्राझार, चिरांग, बक्सा आणि उदालगुडि या भागांना मोठा लाभ होणार आहे. आसाम करारातील कलम-6 देखील लवकरात लवकर लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकरणाशी संबंधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर केंद्र सरकार वेगाने पावले उचलणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.
‘नागरिकत्व’संबंधी अफवा
आसामविरोधी, देशविरोधी प्रत्येक मानसिकतेला, त्याच्या समर्थकांना देश सहन तसेच माफ करणार नाही. याच देशविरोधी शक्ती आसाम आणि ईशान्येत नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी अफवा पसरविल्या जात आहेत. आसामच्या लोकांचे अधिकार कुणीच हिरावू शकत नसल्याचे आश्वासन देत असल्याचे मोदी म्हणाले.
21 व्या शतकात नवा प्रारंभ
आजचा दिवस आसामसह पूर्ण ईशान्य भारतासाठी 21 व्या शतकातील नवी सुरुवात, एक नवी पहाट, नव्या प्रेरणेचा स्वागत करण्याचा आहे. आसाममध्ये अनेक सहकाऱयांनी शांतता आणि अहिंसेच्या मार्गासह लोकशाहीचा स्वीकार केला आहे. भारताच्या राज्यघटनेला अंगिकारले आहे. बोडोलँड चळवळीत सामील राहिलेल्या सर्व लोकांचे देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाल्याने स्वागत कतो. 5 दशकांनी पूर्ण सौहार्दासह बोडोलँड चळवळीशी संबंधित प्रत्येक साथीदाराच्या अपेक्षा आणि आकांक्षांना सन्मान मिळाल्याचे मोदी म्हणाले.