मुसळधार पावसामुळे महामार्गावरील वाहतूक पाऊणतास ठप्प
प्रतिनिधी/ चिपळूण
रविवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी परशुराम घाटात मातीचा भराव रस्त्यावर आला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली महामार्ग ठेकेदार कंपणीने मातीचा भराव बाजूला केल्यानंतर पाऊन तासानंतर वाहतूक पुर्ववत झाली.
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी ‘तौक्ते’ या चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर दुपारनंतर वादळ आणि रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर सकाळपर्यत कायम राहील्याने 7 च्या सुमारास महामार्ग चौपदरीकरणातील मातीचा भराव पाण्याच्या लोंढयासह परशुराम घाटात रस्त्यावर आला. विसावा पॉईंटजवळ आलेल्या आलेल्या या भरावामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. लोटे औद्योगिक वसाहतीत सकाळच्या सत्रात जाणारे कामगार, अधिकारी अडकून पडले. महामार्ग ठेकेदार कंपणीने यंत्रसामुग्री लावून मातीचा भराव बाजूला केल्यानंतर पाऊन तासांनी वाहतूक पुर्ववत झाली. मात्र पहील्याच पावसात महामार्ग चौपदरीकरणातील कंत्राटदार कंपणीने पावसाळयापुर्वीची कोणतीही दक्षता घेतलेली नसल्याचे यानिमित्ताने पुढै आले आहे.
लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाला नदीचे स्वरूप
चक्रीवादळासह दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाने नदीचे स्वरूप धारण केले होते. महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने वाहन चालकांना रस्ता दिसेनासा झाल्याने किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या. रविवारी व सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार उडवला. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असल्याचा फटका वाहन चालक व नागरिकांना बसला. जोरदार पावसामुळे शहरातील महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला होता. महामार्गाच्या शेजारी गटारे नसल्याने गटारांचे पाणी महामार्गावरून वाहत होते. लांजा शहरात महामार्गाने पावसाच्या पाण्याने नदीचे स्वरूप धारण केले होते. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक ठरत होते. महामार्ग पाण्याने तुडुंब भरल्याने एक मारुती ओमनी गाडी गटारामध्ये कलंडली. लांजा बाजारपेठेतही पाणी शिरले होते.
राजापुरात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य
चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या नियोजनशुन्य कामाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. महामार्गावर एसटी स्टॅन्ड, कोदवली साईनगर परिसर व राजापूर-शिळ मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. याचा फटका पादचारी व वाहनचालकांना बसत आहे. पावसाळयापुर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वादळ व जोरदार पर्जन्यवृष्टीबाबतची माहिती प्रशासन स्तरावरून दिली जात असताना महामार्ग व्यवस्थापनाने त्याची गांभिर्याने दखल न घेतल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.