राज्यातील सत्ताधारी शिवसेना विरूध्द भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच विकोपाला गेला असून आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन थेट राज्याच्या राजकारणातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या मातोश्रीची कोंडी करण्यासाठी आता जोरदार प्रयत्न विरोधकांनी सुरू केले आहेत, कधी काळी अनेक क्षेत्रात कोंडी झालेल्या लोकांची कोंडी फोडण्याचे काम याच मातोश्रीने बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून केले होते.
मातोश्री हे राज्याच्या नव्हे तर देशातील राजकारणातील प्रमुख सत्ता केंद्र हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून मानले जाते. याच मातोश्रीतील इशाऱयाने देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. विविध क्षेत्रातील लोकांच्या कोंडी याच मातोश्रीने फोडल्या होत्या. देशातील प्रमुख समजली जाणारी अमरनाथ यात्रा रोखण्याचा जेव्हा काश्मीरमधील दहशतवाद्यांनी प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांना अंगावर घेऊन हज यात्रेला मुंबईतून एकही विमान उडू देणार नसल्याचा इशारा मातोश्रीतून बाळासाहेबांनी दिल्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली. याच मातोश्रीवर भाजपचे देशातील नेते येऊन बाळासाहेबांची भेट घेत असत. देशातील राजकारणावर सल्ला घेत असत मात्र आज याच मातोश्रीची कोंडी करण्याचे प्रयत्न सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता दिसत आहेत.
मुंबई महापालिकेत अनेक वर्षे सत्ता असणाऱया शिवसेनेवर विरोधीपक्ष असलेल्या भाजपने पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन जोरदार टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच झालेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्यावरच चांगले गाजले. कोरोना काळात करोडोंचा भ्रष्टाचार महापालिकेत झाल्याचा आरोप करत विधानसभेत भाजप विरूध्द शिवसेना असा सामनाच रंगला. महापालिका लुटण्याचे काम शिवसेनेने केल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करताना कोणी कोणी कसे यात आपले हात धुऊन घेतले याचा पाढाच विधानसभेत बोलताना वाचला. इतकेच नव्हे तर फडणवीस यांनी थेट ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.
आत्तापर्यंत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर विद्यमान मंत्री अनिल परब यांची ईडीने चौकशी केली मात्र गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील 6.45 कोटींच्या 11 सदनिका ईडीने जप्त केल्यानंतर राजकारणात एकच भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर थेट ईडीने फास आवळल्यानंतर शिवसेनेत आणि राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला. त्यात अजून भर पडली ती शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीला 2 कोटी रुपये आणि 50 लाखांचे घडय़ाळ गिफ्ट दिल्याची नोंद सापडल्याने. जाधव यांनी जरी मातोश्री म्हणजे आपली आई असा उल्लेख असल्याचे सांगितले असले तरी राजकारणातील सत्ता केंद्र असणाऱया मातोश्रीला बदनाम करण्याची एकही संधी विरोधक सोडणार नसल्याचे त्यांच्या आरोपावरुन दिसते.
शिवसेनेने आपल्यासोबत यावे सत्ता स्थापन करावी यासाठीच हा दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपची पिसे काढताना जर मर्द असाल तर अंगावर या ‘केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून काय वार करता’ असे खुले आव्हानच भाजपला दिले. इतकेच नव्हे तर तुरूंगात असणाऱया नवाब मलिक यांचेही मुख्यमंत्र्यांनी समर्थन करताना जर पहाटेचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर आज अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते ते चालले असते का ? असा सवाल करताना भाजपवर जोरदार टीका केली. मात्र त्या आरोपानंतर यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीने आता मातोश्रीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मातोश्रीतही भुयारी मार्गाने पैसा गेल्याचा आरोप करताना काही गोष्टी उघड झाल्या तर उध्दव ठाकरे यांनाही झोप लागणार नसल्याचे म्हटले होते. आणि दोनच दिवसात डायरीतील मातोश्रीची नोंद सापडली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि भाजप एकत्र असताना 2016 सालीच दसऱयाच्या दिवशी महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन हा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांना मारहाणही केली होती, असे म्हटले जाते याच मुद्यावरुन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून सोमय्या यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला आणि मग त्यांच्या जागी भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आणि सोमय्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर काही काळ सोमय्या यांना भाजपने राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले मात्र शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केले आणि सोमय्या पुन्हा आक्रमक झाले, ते आता भाजपचे फायरब्रँड नेते झाले. सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली इतकेच नव्हे तर अवैध गोष्टींवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा असताना आता थेट हातोडा घेऊन स्वतः सोमय्याच दापोलीतील वादात असलेला रिसॉर्ट पाडण्यासाठी मुंबईतून शेकडो गाडय़ा घेऊन
गेले.
आता सोमय्या यांचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे मातोश्री. शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक, मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीची असलेली नोंदच आता राज्याच्या राजकारणाच्या दिशेने प्रमुख घटना असणार आहे. सुरूवातीला शिवसेनेतील रवींद्र वायकर, आनंदराव अडसुळ, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, श्रीधर पाटणकर, यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता मातोश्रीची कोंडी करणे हेच विरोधकांचे लक्ष्य असणार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ही कोंडी फोडण्यात यशस्वी होणार का ? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.