केंद्रीय तपास यंत्रणा बिगर भाजपा सरकारच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालय गैर गोष्टींच्या मागे हात धुवून लागले आहे. महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी मंत्रालयाला आग लागल्याने काही जात्यात काही सुपात आहेत. पण केंद्रीय तपास यंत्रणांनी ‘मातोश्री’ची कोंडी केली आहे. ओघानेच राज्यात राजकीय अस्वस्थता आहे. महाआघाडी सरकार आणि त्यांचे विविध प्रवक्ते या धाडी, तपास, बदनामी यामुळे संतप्त आहेत. राजकीय सूडबुद्धीने या कारवाया होत असल्याची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची तक्रार आहे आणि भाजपाने कर नसेल तर डर कशाला असे म्हणत अंमलबजावणी संचालनालयाला फ्री हॅन्ड ठेवला आहे व या यंत्रणा कायद्याद्वारेही स्वतंत्र आहेत. ओघानेच राज्यातील सरकार, मंत्री त्यांचे नातेवाईक, लाभार्थी चिंतीत आहेत. कारवाईचा बडगा मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापर्यंत आल्याने सर्वांचे कान टवकारले आहेत आणि भाजपावर आरोपांची धुळवड सुरु आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ हे नरेंद्र मोदींचे वचन आहे ते मागे हटतील असे वाटत नाही. महाआघाडीही गप्प नाही. त्यांनी भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीत संधी सोडलेली नाही. भाजपा नेत्यांच्यावर महाआघाडी विशेषतः शिवसेनेकडून रोज आगपाखड सुरु आहे. राजकारणात ‘सब नंगे’ अशी स्थिती आहे आणि सर्वसामान्य माणसं या वादळात सारे भ्रष्टाचारी उघडे व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा बाळगून आहेत. सर्वसामान्य जनता महागाई आणि रोजच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न घेऊन झगडत असताना सत्तेच्या आणि राजकीय पक्षांच्या वळचणीला असलेले महाभाग कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. हे वास्तव समोर आले आहे. ईडीकडे आलेल्या या तक्रारी व त्यांनी केलेली कारवाई, टाकलेल्या धाडी केवळ सत्तेसाठी नकोत तर भ्रष्टाचार विरोधी असल्या पाहिजेत अशी भूमिका नागरिकांची आहे आणि ती चुकीची वाटत नाही. राजकीय धुळवड सुरु असताना सर्वसामान्यांना महागाईचे फटके बसत आहेत. गॅस महागला,पेट्रोल दरवाढ झाली, बेरोजगारी वाढते आहे. परीक्षा, शाळा यांचा खेळखंडोबा झाला आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय नाही आणि सत्तेसाठी उभय बाजूकडून रोज जी चिखलफेक होते आहे ती कंटाळवाणी बनली आहे. एकमात्र आहे या साऱया चिखलफेकीने वेगवेगळय़ा नेत्यांचे चेहरे, मुखवटे अधिक उघड झाले आहेत. अंमलबजावणी संचालनालय कोणतेही आरोप झाले आणि संजय राऊत रोज ईडीवर टीका-टिपण्णी व घावावर घाव घालत असले तरी ईडी त्याकडे दुर्लक्ष करुन आपले काम करते आहे. भाजपाचे किरीट सोमय्या वगैरे तक्रारदार महाआघाडी नेत्यांच्या गैरगोष्टींच्या फायली रोज बाहेर काढत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी राज्यात पुन्हा छापासत्र सुरु करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर वक्रदृष्टी टाकली आहे. त्यांच्या अकरा सदनिका ईडीने ताब्यात घेतल्या व त्या जप्त केल्या. पाटणकर मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती आहेत. एकीकडे ईडीने हे पाऊल उचलले तर त्याचवेळेस नवाब मलिक यांच्या संबंधित मालमत्तांवर गोवावाला कंपाऊंडमध्ये छापे टाकले आहेत. शंभर कोटींच्या हप्ते वसुलीसाठी एक मंत्री तुरुंगात गेले. मलिक अटकेत आहेत तर किरीट सोमय्या यांनी ‘डर्टी बारा’ नेत्यांची प्रकरणे हाती घेतली आहेत व रोज धुळवड सुरु आहे. ईडीचा कारवाईचा दणका मातोश्रीपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय अस्वस्थता आहे. महाआघाडीच्या घटक पक्षांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. राजकारण,त्यातील हिशोब,डावपेच हा स्वतंत्र भाग आहे. तथापि नोटबंदीनंतर निघालेल्या बोगस शेल कंपन्या, त्यामधून झालेले मनी लॉड्रींग, बिनव्याजी घेतलेल्या मोठय़ा रकमा, जमा केलेली संपत्ती असे अनेक कांगोरे या कारवायांना आहेत आणि आता त्याची तड लागणार असे दिसते. एक काळ असा होता जेव्हा जात, धर्म आणि धनदांडगे यावर राजकारण जमत हेते पण आता नवी पिढी गुणदोषावर लोकप्रतिनिधी निवडते आणि चुकीला चूक म्हणते हे समजून घेतले पाहिजे आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपण स्वच्छ असल्याचे दाखवून दिले पाहिजे. जोडीला त्यांचे कोणावर आरोप असतील तर सरकार त्यांचेच आहे. त्या संदर्भात कागदोपत्री तक्रार करुन, पुरावे देऊन कारवाई केली पाहिजे. उगीच चिखलफेक व इशारे यांना अर्थ नाही. कायद्याचे प्रश्न नियमाने आणि पुराव्यानेच निकाली निघतात जर पाटणकर निर्दोष असतील तर तसे सिद्ध केले पाहिजे. अंमलबजावणी संचालनालय पुढे जाऊन काय करणार यांची कुणालाच कल्पना नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापर्यंत ईडी पोहोचली या पार्श्वभूमीवर हा ठाकरे कुटुंबावरचा हल्ला आहे. याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे, असे संजय राऊत म्हणत आहेत. शरद पवार यांनीही केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचे म्हटले आहे. मध्यंतरी मोदींनी तपास यंत्रणांना तपास करु द्यावा, त्यांच्यावर राजकीय दबाव नको पण काही राजकीय पक्ष असा दबाव टाकत आहेत. असे सूचक वक्तव्य केले होते तो इशारा ज्यांना समजला त्यांना समजला. नुकत्याच झालेल्या निवडणुकात मोदी-शहा-लड्डा यांनी चांगले यश मिळवले आहे. महाराष्ट्रात त्यांचा आधार घेऊन युती करुन निवडून आलेली शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार चालवते हे त्यांना सहन होणारे नाही. मोदी व भाजपाला रोज ठाकरी भाषेत टीका-टिपणीही आवडणारी नाही. महाराष्ट्रातील जनतेला या निमित्ताने वास्तवाचे दर्शन होते आहे. ‘सब नंगे’ चा अनुभव येतो आहे. आता मुंबई महापालिका व अन्य निवडणुका आहेत. त्यावेळी हा राजकीय संघर्ष तीव्र होईल हे वेगळे सांगायला नको. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष तीव्र होताना दिसतो आहे. ओघानेच होळी, धुळवड झाली तरी राजकीय धुळवड व चिखलफेक थांबेल अशी चिन्हे नाहीत. काचेच्या घरात राहणारी माणसे एकमेकांच्या घरावर दगडे मारु लागली आहेत. या दगडफेकीमुळे काय होणार हे वेगळे सांगायला नको. पण आता दगडे मुख्यमंत्र्यांच्या दारात मातोश्रीपर्यंत पडू लागली आहेत. हे समजून घेतले पाहिजे.
Previous Articleभाजपकडून राज्य सरकारच्या नावाची होळी साजरी
Next Article पाळोळे भागात गढूळ पाण्याचा पुरवठा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.