प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या महामारीत जिह्यातील अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपन्यांनी काम नसल्याने कामगार काढून टाकणे, कामगारांना वेळेत पगार न देणे यासह अन्य मागण्यासाठी जिह्यातील सुमारे 2500 माथाडी कामगार गुरुवार दि. 1 जुलैपासून संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी राजकुमार गोळे यांनी सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाला निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोनाच्या संकटात माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे केली, काही कामगारांचा काम करताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे. त्यातच कोरोनामुळे जिह्यातील एमआयडीसीतील कंपन्या, मार्केट यार्डमधील अनेक दुकानांनी कोरोनाच्या काळात कामगारांना काढून टाकले आहे. त्याचे पगार थकवले आहेत. पीएफची प्रकरणे रखडवली आहेत. पगार वाढ रखडली आहे. टोळी विभाजन रखडले आहे. कामगारांचा मासिक नोंदी रखडल्या आहेत. यासह अन्य मागण्या असून याबाबत सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून अनेक कामे रखडलेली असून माथाडी कामगारांवर अन्याय सुरु आहे. त्यामुळे यासर्व मागण्याचा तात्काळ विचार व्हावा, अन्यथा जिह्यातील 2500 माथाडी कामगार संपावर जाणार आहेत.