साने गुरुजींनी 1938 मध्ये ‘श्यामचा जीवनविकास’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिली होती. त्या कांदबरीतील एका प्रकरणात त्यांनी ‘मानमोडी’ या आजाराविषयी, त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीविषयी लिहिले आहे. ‘मानमोडी’चा आजार म्हणजेच ‘स्पॅनिश फ्लू’. साने गुरुजी म्हणतात, ‘प्रतिभाशाली हिंदी जनतेने त्या रोगाला मानमोडी हे यथार्थ नाव दिले.’ या प्रकरणात गुरुजींनी मानमोडी आजाराच्या साथीच्या काळातील सामाजिक जीवनाचे जे चित्रण केले आहे, त्यातील अधिकांश स्थिती ही आजच्या कोविड-19 महामारीच्या साथीतही लागू होताना दिसून येते.
साने गुरुजी लिहितात, “तो 1918 मधील नोव्हेंबर महिना असेल. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत तर ‘मानमोडी’ या नव्या रोगाने हिंदुस्तानभर कहर माजविला. या रोगाने जेव्हा पहिला हल्ला चढविला तेव्हा लोक गळून जात, परंतु मरत नसत. त्या पहिल्या हल्ल्यात मी व राम सापडलो होतो. चार-पाच दिवस ताप यावयाचा, परंतु ताप निघाल्यावर चालवत नसे. जणू चार महिने ताप येत होता, इतकी अशक्तता त्या तापाने येत असे. पंरतु या पहिल्या हल्ल्यानंतर जो दुसरा हल्ला आला, तो अतिभयंकर होता. त्यातून मनुष्य वाचतच नसे.’’ इथे आपल्याला कोविड-19 ची पहिली लाट आणि दुसरी लाट यातील साधर्म्य दिसून येते. कोविड-19 च्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेमध्ये मृतांचा आकडा अधिक होता. विषाणुचा गुणधर्म अधिक प्रभावशाली होत, रुप बदलत राहणे हा दोन्ही साथीत तसाच असल्याचे दिसून येते. गुरुजी पुढे लिहितात, “मुंबईस रोज सातशेच्या वर लोक मरत होते. ‘म्युनिसिपालिटी खरा आकडा लावीतच नसेल, हजारांवर मरत असतील!’ असे जनता म्हणे. मृत माणसे न्यावयास चार माणसे मिळत नसत. कोणी कोणी आपल्या मृत माणसास पाठंगुळीस घेऊन स्मशानात जात. कोठे कोठे प्रेत काठीला बांधून दोघे-जण लोंबकळवीत नेत. खेडय़ापाडय़ांतून तर पुष्कळांनी प्रेतांना आपल्या घराशेजारीच अग्नी दिले. कोण येणार अन् कोण उचलणार?’’ कोविड-19 महामारीच्या स्थितीतही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची आणि समाजाची मानसिकता आपल्याला याहून वेगळी अनुभवण्यास मिळाली नाही. आजही कोविड-19 मुळे मृत पावलेल्यांचा आकडय़ांवरुन वाद होताना दिसून येतात. नुकतेच कोविड-19 झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत होणारा मृत्यु हा कोविड मृत्यु मानला जाईल, असे शासनाने म्हटले आहे. या नियमाने कोविड मृत्युचा आकडा वाढेल. कोविड-19 संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात संसर्ग झालेल्या व्यक्तींना, कधी-कधी तर संपूर्ण कुटुंबाला कोविड उपचार केंद्रामध्ये दाखल करीत असत. खेडोपाडय़ात दहा दिवस स्थानबध्द होण्याच्या भीतीनेच लोक संसर्ग लपवून ठेवत होते. या संसर्गातून झालेल्या मृत्युंचे आकडेही शासकीय नोंदीत यायला हवेत.
मानमोडीच्या साथीत डॉक्टरांच्या वर्तणुकीविषयी गुरुजी लिहितात, “1918 च्या मानमोडीच्या साथीत डॉक्टरांनी अपार पैसा मिळवला. त्यांनी मोटारी घेतल्या. ‘तो मला पंचवीस रुपये देत आहे, तुम्ही तीस देत असाल तर तुमच्याकडे येतो-’ असे काही डॉक्टर खुशाल सांगत.’’ कोविड-19 संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेत संक्रमणाने जेव्हा उच्चांक गाठला होता तेव्हा आपण हाच अनुभव घेतला होता. खासगी रुग्णालयात गरीब रुग्णांना खाटा उपलब्ध होत नव्हत्या. काही मध्यमवर्गीय जीवनभर साठवलेल्या मिळकतीची विल्हेवाट लावून लाखो रुपये खर्च करुन उपचार घेत होते. रुग्णांचा आकडा, त्यातील शारीरिक गुंतागुंतीचा भाग आणि सरकारी इस्पितळातील खाटांची कमतरता या सर्व परिस्थितीत अतिदक्षता विभागात दाखल करुन घेण्यासाठी रुग्ण वा त्याच्या नातेवाईकांना अक्षरशः जंग जंग पछाडावे लागत होते. काही धनाढय़ लोकांनी गरज पडलीच तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून आवश्यकता नसतानाही पैसे देऊन खाटा राखून ठेवल्या होत्या. साथीच्या, महासाथीच्या काळातील काही डॉक्टरांची मानसिकता तेव्हाही वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याची होती आणि आजही आहे.
याच प्रकरणात साने गुरुजी एका ठिकाणी लिहितात, “त्या तीन-चार महिन्यांतील सर्व कथा गोळा केल्या, तर कारुण्यसागर उचंबळेल. काही काही कुटुंबांतून सर्वच्या सर्व माणसे मरण पावली. सारी अंथरुणावर पडलेली. अन्नपाणी देण्यास कोणी नाही. आई-बाप, मुले-बाळे, बहिणी-भाऊ, पती-पत्नी सारी मरणशय्येवर. तो तिच्याकडे बघतो, ती त्याच्याकडे बघते. आई बाळाकडे बघते, बाळ आईकडे बघतो. आपल्या मुलाचे मरणकाळी मिटणारे डोळे माता बघते, परंतु तिला उठवत नाही. मुलाचे मरण पाहून तिला वात होतो. भयाण देखावे! दगडास पाझर फोडणारे प्रसंग!’’ साथ शंभर वर्षांपूर्वीच्या मानमोडीची असो वा 2020 मधील कोविड-19ची; आपतकालीन परिस्थितीत माणुसकीपेक्षा माणुसकीहीनतेचे दर्शन अधिक दिसून येते. आपल्या शेजारी राहणारी व्यक्ती आठ दिवस घराबाहेर पडली नाही तर विचारपूस करणारे, आजारपणाच्या काळात दोन वेळचे जेवण पुरवणारे, गरज पडल्यास तिला डॉक्टरांपर्यंत घेऊन जाणारे मानवताधर्म निभावणारे मोठय़ा प्रमाणात दिसायला हवे होते. माणुसकी धर्म समाजात असतोच. त्याची व्याप्ती अधिक दृष्य असायला हवी. साने गुरुजी पुढे लिहितात, “आजारात सर्वत्र मोफत औषध मिळेल, गरीबातील गरीबासही इन्जेक्शन घेता येईल, शास्त्रीय उपचार त्याला मिळतील-अशी समाजव्यवस्था कधी होईल? ज्या वेळेस हा ‘श्रीमंत’ व हा ‘गरीब’ हा भेदच जगातून जाईल तेंव्हा. मानवतेचा खरा धर्म येईल तेंव्हा. तोपर्यंत मानमोडी येणार आणि कोटय़ावधी लोकांची मान मोडणार.’’
साने गुरुजींनी मानमोडी साथीच्या काळातील नोंदवलेली समाजमनाची ही निरीक्षणे सर्वकालिक आहेत. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटूनही गरीब, असहाय, वंचित वर्गाला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी पदोपदी झगडावे लागते, ही बाब दुर्दैवी आहे. ‘साथरोग प्रतिबंधक कायदा 1897’ मध्ये झालेले बदल ही त्यातल्या त्यात समाधानाची बाजू. महासाथीच्या आरोग्य आपतकालीन स्थितीत गरीब-श्रीमंत भेद अधिक तीव्र होत जातो. गरीब आणखी गरीबीकडे ढकलला जातो. शोषण, पिळवणुक, भूकबळी, लूट यासारख्या सामाजिक समस्या आणखी तीव्र होत जातात. सामाजिक-मानसिक स्वास्थ्याचे नवीन प्रश्न निर्माण होत राहतात. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या मानमोडीच्या साथीत आपण पारतंत्र्यांत होतो. आता आपण आरोग्य, संशोधन, तंत्र-विज्ञानामध्ये बऱयापैंकी प्रगती केली आहे. भविष्यात मानमोडी (स्पॅनिश फ्लू), कोविड-19 सारख्या आरोग्य आपत्तीत, आपतकालीन व्यवस्थापन, सर्वांसाठी आरोग्य, आरोग्यदायी सवयी, जबाबदार वर्तणुक, सार्वजनिक आरोग्याची शिस्त इ. बाबींचे एक आदर्श प्रारुप तयार करण्यासाठी शिक्षण संस्थांनी संशोधन करुन, स्वयंसेवी संस्थांनी प्रशिक्षणामार्फंत योगदान दिले पाहिजे. साने गुरुजींच्या माणुसकी धर्मावर वाटचाल करण्यासाठीची वेळ आता येऊन ठेपली आहे.
डॉ. स्वाती अमराळे जाधव