जिल्हय़ात बळीराजाची शेतात लगबग वाढली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मान्सूनचे आगमन या हंगामात वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी शेताकडे धाव घेऊ लागला आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जिल्हय़ातील शेतकरी धूळ पेरण्यांना प्रारंभ करतो. यावर्षी वेळेत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज बांधत रत्नागिरी जिल्हय़ातील शेतकऱयांनी धुळ पेरण्यांना प्रारंभ केला आहे.
खपाच्या हंगामासाठी शेतकऱयांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हय़ात 70 हजार 334 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. त्यासाठी दोन ते अडीच हजार क्विंटल भात बियाण्यांची पेरणी करण्यात येते. येत्या हंगामात शेतकऱयांना सुधारित व संकरित भातबियाणी वेळेत मिळण्यासाठी 1886.21 क्विंटल भातबियाण्यांची त्याचबरोबर 20 हजार 250 मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. भात बियाण्यांबरोबरच अडीच हजार टन खत जिल्हय़ात दाखल झाले आहे. आगामी खरीपाच्या हंगामासाठी जिल्हय़ात शेतीच्या मशागतीची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. खरीपाला प्रारंभ होताच शेतकरी रोहिणी नक्षत्रावर शेतीच्या पेरण्यांना खऱया अर्थाने प्रारंभ करतात. अनेक शेतकरी पावसाला प्रारंभ होण्यापूर्वीच धूळ वाफेच्या पेरण्या करतात.
एकंदरीत मान्सूनपूर्व खरिपाचा पेरा म्हणून सध्या धूळ पेरण्यांची लगबग सुरु आहे. शेतीसाठी आधुनिक व संकरित कृषी वाणांचे शाश्वत उत्पन्न देणारे भातबियाणी घेण्याकडे शेतकऱयांचा अलिकडे कल वाढला आहे. संकरित भात बियाणे व घरची बियाणे अशा दोन्ही बियाणांचा सर्रास वापर शेतकरी करत आहे. मात्र खरीप हंगामाच्या तयारीत मान्सूनपूर्व सरी पडल्यास ती धोक्याची घंटा ठरु शकते. तरीही आकाशातील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती सध्या जुगार ठरत असूनही शेतकऱयांना हा खेळ दरवर्षी मांडावा लागतोच. मान्सूनची वाटचाल व प्रगतीत अनुकूल स्थिती लाभल्याने मेघांचा वर्षाव व नक्षत्रांचं देणे लाभल्यावर शेतकरी आपल्या कामाला सुरूवात करतो. गेले वर्षभर शेतात कष्ट करणारे लाखो हात पावसाच्या आगमनाने सुखावून जातात. मान्सूनच्या आगमनापूर्वी 10 दिवस आधी पेरलेले बियाणे भिजून ओलेचिंब झाल्यावर त्याला अंकुर फुटतात व चांगले वाफे तयार होतात. त्यामुळे शेतकरीवर्गातून धुळ पेरण्यांना महत्व दिले जात आहे.