सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले : खरिपाची लगबग सुरू : पहिल्याच पावसाने शहर जलमय
प्रतिनिधी/सांगली
विजांच्या गडगडाटासह गुरूवारी मान्सूनपूर्व पावसाने `दमधार’ हजेरी लावली. सांगली, मिरज शहरासह जिल्हÎात मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी भागातील ओढे आणि नाले तुडुंब भरले. तर सांगलीतील नालेसफाईचे पितळ पहिल्याच पावसाने उघडे पाडले. शहरातील प्रमुख चौक जलमय झाले. या दमदार पावसाने खरीप, हंगामाची लगबग सुरु झाली आहे.
गुरुवारी चांगला पाऊस झाला असला तरी 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱयांनी खरीप पेरणी सुरू करू नये असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. बुधवारी पावसाने सलामी दिली होती. आणि गुरुवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी अंधारुन आले व ढग बरसू लागले. बत्तीही गुल झाली. सुमारे दोन तास जोरदार पावसाने अनेकांची त्रेधा उडाली. स्टेशन चौक, शिवाजी पुतळा, मारूती चौक, जुना बुधगाव रोड, झुलेलाल चौक, आंबेडकर रोड या पारंपरिक चौकातील वाहतूक साचलेल्या पाण्यामुळे विस्कळीत झाली. तर विस्तारीत भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधा उडाली.
शेतीसाठी हा पाऊस चांगला आहे. तथापि जमिनीत खोलवर ओल व तापमानात योग्य बदल झाल्याशिवाय पेरणी करु नका असे कृषि तज्ञ सांगत आहेत. दरम्यान, सोयाबीन व शिराळा तालुक्यातील धूळवाफ पेरण्यांना हा पाऊस सोईचा आहे. मान्सूनची चाहूल लागल्याने खरीप हंगामाची धांदल सुरु झाली आहे. प्रशासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवाबरोबरच कृषि दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱयांची खते, बियाणे खरेदीसाठी दुकानात गर्दी होऊ लागली आहे. या दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी होऊ लागली आहे.
सांगली मिरज शहरांसह जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी भागात अनेक ओढे आणि नाल्यांना पाणी आले. तर काही भागात छोटे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली. ग्रामीण भागात गुरूवारी दुपारपासूनच वीज खंडीत झाला. शहरात सायंकाळी काही काळ वीज पुरवठा खंडीत केला होता. अचानक झालेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
80 ते 100 मिमी पावसाशिवाय पेरणी नको
शेतकऱयांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱया ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱयांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.