प्रतिनिधी/ सातारा
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून दि. 3 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला असून त्याची आगेकूच सुरु आहे. दि. 5 रोजी महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला असला तरी साताऱयात वादळी वाऱयाबरोबरच मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी सायंकाळी साताऱयाला झोडपले. सातारा शहरासह जिल्हय़ाच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. खरीप पेरणीपूर्व हंगामातील कामे अंतिम टप्प्यात असताना या पावसाने बळीराजा सुखावला आहे. त्यातच मान्सूनची वाटचालही जोरदार सुरु असल्याने जिल्हय़ात केंव्हाही दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरु होता. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित झाला होता.
शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मेघगर्जनेसह पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला जात होताच. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार दि. 7 मे नंतर महाराष्ट्रात दाखल होईल असे वर्तवण्यात आले होते. परंतु मान्सूनची वाटचाल पाहता तो त्यापूर्वीच महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला आहे. मात्र सातारा जिल्हय़ात पडणारा पाऊस जोरदार असला वादळी वारे व अधून मधून वीजांचा लखलखटात तसेच पूर्वेकडून कोसळणारा पाऊस यामुळे हा पाऊस मान्सूनपूर्व वाटत होता. असे असले तरी मान्सून दाखल होण्याची चिन्हे मात्र दिसू लागली आहेत.
साताऱयात पाणीच पाणी
शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान सुरु झालेल्या पावसाने शहरात पाणीच पाणी केले. रस्त्यावरुन मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहत होते. तर बेसमेंटमधील दुकानगाळय़ांमध्ये पाणी साठून राहिले होते. कोरोनाच्या महामारीत अडकलेल्या आरोग्य विभागाला मान्सूनपूर्व कामे करायला तितकासा वेळ न मिळाल्यामुळे शहरातील गटर्स तुडुंब भरुन वाहत होती. त्यामुळे मैला रस्त्यावर आला होता.
बळीराजा सुखावला
शहराबरोबरच जिल्हय़ातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. खरीप हंगामापूर्वीची कामे अंतिम टप्प्यात असून बळीराजा मान्सूनच्या प्रतिक्षेत होता. त्यापूर्वीच या पावसाने चांगले काम झाले असल्याने बळीराजा सुखावला होता. मान्सून दाखल होताच लवकरच पेरणीला सुरुवात असणार असल्याचे अनेक शेतकऱयांनी सांगितले.
पोलिसांचीही उडाली तारांबळ
सातारा जिल्हा रेड झोन असल्याने कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे संचारबंदी असून शहराबरोबरच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. परंतु या पावसाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ऐनवेळी आलेल्या पावसाने पोलिसांनाही कशाचा तरी आधार घेऊन बसावे लागले. त्याचबरोबर जम्बो काविड हॉस्पिटल व सातारा जिल्हा रुग्णालय परिसरातही रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली.
वर्धनगड घाटाला आले धबधब्याचे स्वरुप
साताऱयासह, जावली, महाबळेश्वर, वाई, कोरेगाव तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जोराच्या पावसाने शेतशेवारात पाणीच पाणी झाले होते. वर्धनगड घाटात पाण्याचे लोट वाहत असल्यामुळे घाटाला धबधब्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.