पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती, ‘अंफन’ चक्रीवादळामुळे चालना
प्रतिनिधी / पुणे
नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमान समुद व निकोबारच्या बेटांवर रविवारी दाखल झाला. मान्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे व अंदमान समुद्रात प्रवेश केला असून, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नवीन तारखेनुसार 22 मेच्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र, यंदा पाच दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात ‘अंफन’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनला मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली आहे. अंदमान निकोबार बेटांवर गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली असून, या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण पोषक असून, येत्या 48 तासांत दक्षिण बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, अंदमान समुद्राचा समुद्र, अंदमान बेटे, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रवेश करेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
‘अंफन’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार
सध्या ‘अंफन’ चक्रीवादळ हे दक्षिण बंगालच्या उपसागरातील मध्य भागावर आहे. ओरिसाच्या परादीप या बेटाच्या दक्षिणेला 980 कि.मी.वर, पश्चिम बंगालच्या दिघापासून दक्षिणेला 1130 कि.मी.वर तसेच बांगलादेशच्या खेपुपारापासून दक्षिणेला 1250 कि.मी.वर दूरवर आहे. येत्या 12 तासांत या वादळाची तीव्रता वाढणार असून, त्याचे महाचक्रीवादळात रुपांतर होईल. यानंतर त्याचा मार्ग बदलून ते उत्तरपूर्वेच्या दिशेने प्रवास करेल. 20 मेच्या दुपारी किवा संध्याकाळी हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल व बांगलादेशच्या किनारपट्टीच्या दरम्यान असणाऱया दिघा व हथिया बेटांदरम्यान धडकेल. दरम्यान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल व ओरिसाच्या किनारपट्टीवर 18 मेपासून जोरदार पाऊस होणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पाऊस
राज्याच्या अनेक भागात रविवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. 20 मे नंतर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
5 जूनला केरळात येणार
दरवर्षी केरळात मान्सून 1 जूनच्या आसपास दाखल होतो. यंदा मात्र त्याचे आगमन 4 दिवसाने लांबणार असून, 5 जूनपर्यंत तो केरळात आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे मान्सून अंदमानात लवकर आला असला तरी त्याचा भारतीय भूमीवरील प्रवेश लांबणार आहे.