प्रतिनिधी/ पुणे
नैत्य मान्सून वारे अर्थात मान्सून येत्या 5 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला. त्यामुळे मान्सूनच्या कर्नाटक व महाराष्ट्रातील आगमनाबाबतही औत्सुक्य राहणार आहे.
सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनपर्यंत भारतीय देवभूमी अर्थात केरळात दाखल होतो. परंतु यंदा चार दिवसाने त्याचे आगमन लांबण्याची चिन्हे आहेत. तसेच अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या 16 मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनला चालना देणारे ठरणार असून, 17 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अंदमानच्या दक्षिण भागातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे 16 मेच्या सायंकाळपर्यंत चक्रीवादळात रुपांतर होईल. हे कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनला चालना देणारे ठरणार आहे. अंदमानात गेले दोन दिवस जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे मान्सून येत्या दोन दिवसांत अंदमानात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
केरळात उशिरा
यंदापासून हवामान विभागाने मान्सूनच्या आगमन तसेच परतीच्या तारखा बदलल्या आहेत. 1 जूनला सर्वसाधारणपणे मान्सूनला केरळात दाखल होतो. यंदा मात्र, त्याचे आगमन चार दिवसाने लांबत तो 5 जूनला केरळात पोहोचण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा भारतात मान्सून सरासरीइतका राहणार आहे. यात चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. तसेच मान्सूनच्या सुरुवातीला एल निनोची शक्यता कमी असली तरी मान्सूनच्या दुसऱया टप्प्यात एल निनोची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.