वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील भारतात होणाऱया आगामी मालिकेसाठी तसेच येत्या डिसेंबरमधील भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱयासंदर्भात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या कार्यकारिणी समितीची बैठक 17 ऑक्टोबर रोजी बोलाविण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये 2020-21 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाबाबत निर्णय होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. देशातील कोरोना महामारी परिस्थितीचा आढावा घेत राष्ट्रीय क्रिकेट हंगाम सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. आयसीसीच्या विविध स्पर्धा वेळापत्रकानुसार इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱयावर जानेवारी महिन्यात येणार असून या दौऱयात उभय संघात पाच कसोटी, तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळविण्याचा प्रस्ताव आहे. जानेवारी महिन्यात देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच इंग्लंडच्या भारत दौऱयातील विविध मालिकांमधील सामन्यांची संख्या निश्चित करण्यात येईल. पण कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडचा भारत दौरा निश्चित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून प्रयत्न केले जातील, असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केला.
भारतातील कोरोनाच्या प्रसारामध्ये वाढ होत असल्याने आयपीएल स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच संयुक्त अरब अमिरातमध्ये घेतली जात असल्याचे उदाहरण गांगुलीने यावेळी दिले. मुंबई शहरामध्ये आता अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेले तीन क्रिकेट स्टेडियम्स सुसज्ज आहेत. वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि डी. वाय. पाटील स्टेडियम यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये अलीकडेच मोतेरा स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले होते. जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. इंग्लंडच्या भारत दौऱयात या स्टेडियम्समध्ये सामने आयोजित करण्याची बीसीसीआयने इच्छा व्यक्त केली आहे. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणारी सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धा कोरोना परिस्थितीमुळे पुन्हा लांबणीवर टाकण्याची शक्मयता दिसत आहे.