आतापर्यंत 40 लाख कार्सची विक्री
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कंपनीच्या आल्टो मॉडेलने दोन दशकांचा यशस्वी प्रवास पूर्ण केलेला आहे. सदरच्या 20 वर्षात कंपनीने आल्टोची आतापर्यंत 40 लाखापेक्षा अधिकची विक्री केली असल्याची माहिती दिली आहे.
मारुती कंपनीने मंगळवारी दिलेल्या माहितीमधून म्हटले आहे, की आल्टोला भारतीय ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली असल्याने ती सर्वसामान्यांसह उच्चवर्गीयांमध्येही आवडीचे मॉडेल म्हणून स्थान मिळवू शकली आहे. भारतात मारुती सुझुकीने आपले स्थान या गाडीच्या बळावर अधिक मजबूत केले आहे.
मागील दोन दशकांच्या प्रवासात आल्टोने भारतात चांगली लोकप्रियता मिळवली आहे. यात गेल्या 16 वर्षात सदर मॉडेलने विक्रीचा विक्रम नेंदवला असल्याचेही यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले.
ग्राहकांच्या मागणीनुसार बदल
बाजारातील ग्राहकांची आवड आणि मागणी लक्षात घेत मारुती सुझुकी कंपनीने आपल्या वाहन निर्मितीत वेळोवेळी बदल करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास प्राधान्य देत गेल्यानेच हा एक सकारात्मक लाभ पहावयास मिळाल्याचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.