तिसऱया लाटेची भीती, कृषी कायद्यांची वापसी, पेटीएमचा भ्रमनिरास, रिलायन्सकडून रद्द करण्यात आलेला प्रस्तावित करार यांसारख्या विविध घटनांमुळे शेअर बाजार सध्या वर-खाली गटांगळय़ा खाताना दिसतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच साधारण मार्च 2020 मध्ये 25 हजारांच्या आसपास घसरलेला शेअर बाजार मागच्या दीड वर्षांत सातत्याने उसळतच आहे. ओसरलेली साथ, लसीकरण, आर्थिक आघाडीवर तयार झालेले आशादायक वातावरण यामुळे या कालावधीत सेन्सेक्सचा हा आलेख चढताच राहिल्याचे पहायला मिळते. मध्यंतरी तर निर्देशांकाने विक्रमी 62 हजार 245 पर्यंत मजल गाठत नवा इतिहास रचला होता. किंबहुना, त्यानंतर 60 हजारांच्या आसपास स्थिरावलेल्या शेअर बाजारातील मागच्या दोन दिवसांमधील पडझड गुंतवणूकदारांसाठी चिंता वाढविणारीच म्हटली पाहिजे. निर्देशांक तब्बल 1170 ने घसरून 58,465 खाली येणे, हा तसा मागच्या सात महिन्यांतील विक्रम म्हणावा लागेल. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 7.86 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या अर्थी सोमवार हा ‘ब्लॅक मंडे’च. तर मंगळवारी सेन्सेक्स 57 हजार 718 पर्यंत खाली जाऊन पुन्हा 58 हजार 600 पर्यंत रिकव्हर होणे, हे त्यातल्या त्यात दिलासादायक. स्वाभाविकच पुढचे काही दिवस हा ट्रेंड कायम राहणार की हे मळभ दूर राहणार, याबाबत औत्सुक्य असेल. जगातील व देशातील वेगवेगळय़ा घटनांचा मार्केटवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होत असतो. मार्केटचा सध्याचा मूड हा याचाच परिपाक होय. बाजाराचे नेतृत्व करणाऱया रिलायन्स समूहाचा ‘सौदी अरामको’ या कंपनीसोबत करार होणार होता. त्यानुसार रिलायन्सच्या तेल शुद्धिकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील 20 टक्के हिस्सा सौदी अरामकोला 15 अब्ज डॉलरला विकला जाणार होता. मात्र, व्यवसायाचे स्वरुप बदलल्याने कराराचा फेरआढावा घेण्याचे रिलायन्सने स्पष्ट केल्याने कराराला ब्रेक लागला. स्वाभाविकच रिलायन्सचे समभाग पडणार, हे निश्चित होते. तथापि, ते साडेचार टक्क्यांनी कोसळल्याने या घसरणीचा इतर समभागांवर परिणाम झाला. गतसप्ताहात नोंदणी झालेल्या पेटीएमच्या आयपीओने केलेला भ्रमनिरास हेही बाजारातील निरुत्साहाचे आणखी एक कारण. इतिहासातील सर्वांत मोठा आयपीओ ठरलेल्या पेटीएमचा फुगा ज्या पद्धतीने फुटला, ते पाहता त्यापासून बोध घेणे आवश्यक ठरते. 2150 ला गुंतवणूकदारांना प्राप्त झालेला हा समभाग प्रत्यक्षात मायनसमध्येच सुचिबद्ध झाला. आत्तापर्यंत 40 टक्क्यांवर या समभागाच्या मूल्यांची घसरण झाली असून, ही घसरण 1200 रुपयांवर जाण्याची शक्यता ‘मॅक्वायरी’ या ब्रोकरेज हाऊसने वर्तविली आहे. हे पाहता हा समभाग लवकरच नफ्यात येण्याची शक्यता कमीच आहे. वास्तविक, या समभागाची किंमत अनावश्यक वाढविण्यात आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना नुकसान सोसणे वा वेट अँड वॉचचे धोरण अवलंबण्याशिवाय पर्याय नाही. मागच्या वर्षभरात कोरोनाच्या लाटांवर लाटा आदळूनही त्याचे पूर्णतः निर्मूलन करता आलेले नाही. जगभरात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत. युरोप खंडातील ऑस्ट्रीयामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर्मनी, झेक, बेल्जिअम, स्लोव्हाकियातही रुग्ण वाढत आहेत. महासत्ता अमेरिकेतही वेगळी परिस्थिती नाही. भविष्यात कोरोनाचा हा प्रभाव अन्यत्रही वाढू शकतो. भारतातही जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक बाजारात काळजीचे वातावरण असून, भारतीय गुंतवणूकदारांनीही त्याची धास्ती घेतली आहे. सध्या गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, हे त्याचेच द्योतक. पुढच्या टप्प्यात कोविडची स्थिती कशी असेल, यावरही बरीच गणिते अवलंबून असतील. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, हे कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जाहीर केले आहे. बाजारात या निर्णयाचेही पडसाद उमटताना दिसतात. प्रामुख्याने सरकारी बँकांच्या समभागांना या निर्णयाचा फटका बसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनमध्ये औद्योगिक उत्पादन वाढले असले, तरी किरकोळ विक्री कमी झाली आहे. शिवाय चलनवाढीचा धोका असल्याने उत्पादनालाही त्याचा फटका बसू शकतो. दुसरीकडे डॉलरच्या मूल्यामध्ये वाढ होत आहे. सलग दोन आठवडे देशाची परकीय गंगाजळी रोडावते आहे. कोरोनाच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था बाहेर येत असली, तरी आयात वाढते आहे. खनिज तेलाच्या दरातील घट भारतासाठी दिलासादायक असली, तरी मागणी कमी झाल्याने कपात होणे, हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक मानले जाते. यामुळेही गुंतवणूकदारांच्या मनात भीती दाटल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून बँकांमधील व्याजदर झपाटय़ाने कमी होत आहेत. त्यात आर्थिक अस्थैर्य. त्यामुळे लोक मोठय़ा प्रमाणात शेअर बाजाराकडे वळताना दिसतात. कोरोना काळात विक्रमी संख्येने डिमॅट अकाऊंट निघाली, ती म्हणूनच. शेअर मार्केट हा जोखमीचा व्यवहार असला, तरी योग्य अभ्यास, टायमिंग व लाँक टर्मचा विचार करीत गुंतवणूक केल्यास त्यातून चांगल्या परताव्याची अपेक्षा असते. मागच्या दीड वर्षांचा विचार केला, तर अनेकांना उत्तम आऊटपूट मिळाला, हे नाकारता येत नाही. प्रत्येक क्षेत्रात चढउतार हे असतातच. शेअर बाजारही त्याला कसा अपवाद असेल? वर्षभरात मार्केट 80 हजारांवर जाण्याचाही अंदाज आहेच. आपल्याकडे आर्थिक साक्षरतेचा अभाव आहे. ती वाढावी. एकेकाळी शेअर बाजाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अत्यंत निगेटिव्ह असे. आता बदल होणे, हे सुचिन्ह. मुळात मार्केट ही संयमाची परीक्षा असते. योग्य आकलन व अर्थभानासह हुरळून वा खचून न जाता दीर्घकालीन वा मध्यमकालीन गुंतवणूक केली, तर अशा हेलकाव्यांतूनही अंतिमतः तरता येते. हे लक्षात घ्यावे.
Previous Articleराजापुरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांवर ‘ईडी’ची नजर
Next Article भूगर्भात सातत्याने बाहेर येतेय पाणी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.