मार्क्स लिस्ट पालक म्हणजे परिक्षेतील मार्कांसाठी मुलांना धारेवर धरणारे पालक! अशा पालकांनी मुलांच्या व्यतिमत्वाचा शोध घेऊन त्यांच्या जीवनाची दिशा ठरवावी. करिअरची योग्य निवड केल्यास आवडीच्या क्षेत्रात मात्र मुलं मार्क्स नक्की मिळवतील. मुळात परिक्षेतील मार्क्सवाद ही सर्वथैव चुकीची गोष्ट आहे.
लक्षात घ्या, जीवनात जे लोक मोठे झालेले दिसतात. ते बोर्डाच्या मेरीटलिस्टमध्ये होते का? आणि जे तथाकथित हुशार बोर्डाच्या मेरिटलिस्टमध्ये होते, तेच पुढे जीवनात मोठे झाले का? सहसा परीक्षेतील यश आणि जीवनातील यश यांचं प्रमाण व्यस्तच आढळतं. तर मग विचार करा की मुलाला कुणीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला हवं?
दहावी-बारावीतील यश म्हणजे काही सर्वस्व नाही. हा तर केवळ एक टप्पा आहे. तसंच शैक्षणिक यश हे पुढील यशाची ग्वाही नाही. शिक्षणक्रम जरी पूरक असला तरी शिक्षण परीक्षेतील यश म्हणजेच काही सर्व नाही याची जाणीव असू द्या. शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळालं तर आनंद आहेच पण नाही मिळालं किंवा कमी मिळालं तरी टेन्शन नको. इतर पर्याय आणि मार्ग असतातच. दहावी-बारावीत उतम यश मिळवून पुढील आयुष्यात अपयश किंवा सामान्य यश मिळालेली खूप उदाहरणं आहेत. तसंच दहावी-बारावीत अपयश किंवा सामान्य यश मिळवूनही पुढे नोकरी किंवा व्यवसायात उत्तम यश मिळवणारेही खूप आहेत.
महाराष्ट्रात शिकून नोकरी/पेशा-पैसा असे समीकरण झाले आहे. गुजराथसारख्या राज्यात दहावी नापास सुध्दा उत्तम व्यवसाय करतो आणि रग्गड पैसा कमवितो. महाराष्ट्राच्या बहुतांशी मुलांचे पालक मात्र आपल्या मुलांच्या मनावर व्यवसाय करण्याचे संस्कार करीत नाहीत. 2020 सालानंतर नोकऱया अत्यंत कमी होतील आणि काम मात्र वाढेल. तरीही पालक नोकरीच्या दृष्टीने शिक्षणक्रम किंवा आएएएस, सीए, डॉक्टर किंवा इंजिनीअर हो असा सल्ला देतात.
जी सर्वांची क्षमता नसते. आणि तशी गरजही नसते. तरीही आईवडिलांच्या आग्रहापायी, नातेवाईकात इज्जत का सवाल म्हणून तसा प्रयत्न केला जातो. मार्क्स मिळविण्याचा प्रचंड ताण आणि धडपड सुरु होते. आवड नाही, गती नाही, मती नाही म्हणून प्रगती नाही. मुलं नापास होतात. कमी मार्कामुळे ऍडमिशन मिळाली नाही म्हणून निराश होतात. मनोरुग्ण होतात. किंवा काहीजण तर आत्महत्याही करतात.
खरं तर नापास मुलांनाही उत्तम करिअर देता येणं सहज शक्मय आहे. मुलांबाबतचे अनुभव, निरीक्षण आणि करिअरसंबंधी मानसशास्त्राrय चाचण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. परीक्षांतील मार्कांपेक्षा महत्वाचं आहे मुलांचे व्यक्तिमत्व, गुणदोष, क्षमता आणि आवड यानुसार करिअरची निवड करणं जेथे मुलं नक्कीच उत्तुंग यश मिळवतील.
डॉ. रमा मराठे