वार्ताहर/ मार्गताम्हाने
गेले 2 महिने पाण्यापासून वंचित राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द येथील ग्रामस्थांची वणवण कमी झाली आहे. गावातीलच एका खासगी विहिरीवरुन पाणी योजना कार्यान्वित करण्यात आलेली असून रविवारपासून प्रत्यक्ष पाणी पुरवठय़ाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेले अथक प्रयत्न शेवटी फळाला आले असून याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
मार्गताम्हाने खुर्द गावाला गेली कित्येक वर्षे पाणी पुरवठा करणाऱया विहिरीचा काही भाग चार महिन्यांपूर्वी ढासळला होता. मात्र या विहिरीच्या जागेचे बक्षीसपत्र नसल्याने तिची दुरुस्ती करण्यात मोठे अडथळे आले होते. अखेर ही विहीर जूनच्या पहिल्या आठवडय़ात मुसळधार पावसात पूर्णतः कोसळली आणि पाणी योजनेवर मोठा परिणाम झाला. ग्रामस्थांची ऐन पावसाळ्यात वणवण सुरु झाली. ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्क राहून पाणी योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. गावातील खासगी विहिरींचा शोध लावून संबंधीत मालकांना विचारणा केली. यापैकी जयवंत चव्हाण व हरिश्चंद्र चव्हाण या बंधुंनी गावाच्या पाण्याची गैरसोय व गंभीरता लक्षात घेऊन आपली खासगी विहीर पाणी योजनेसाठी तात्पुरत्या स्वरुपात वापरण्यासाठी दिली.
पाण्याचा प्रश्न सुटला, पण खासगी विहिरीवरुन कोसळलेल्या सार्वजनिक विहिरीच्या पंप हाऊसपर्यंत पाणी कसे न्यायचे, असा यशप्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला. अखेर ग्रामपंचायत सदस्य व गावातील टेक्निशियन स्वप्नील मुंढेकर यांनी शक्कल लढवत एका दिवसात वाहिनीचे काम करुन ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन दिले. पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असला तरी सरपंच सीमा कोतवडेकर, उपसरपंच दिलीप पवार, टेक्निशियन मुंढेकर यांनी जे महिनाभर प्रयत्न सुरु केले त्याचे अखेर चीज झाले. खासगी विहिरीवर नवीन पंपाची आवश्यकता असल्याने व लॉकडाऊनमुळे तो कोल्हापुरातून मागवण्यास विलंब होत आहे. त्यामुळे मुंढेकर यांनी पाण्याची गंभीरता लक्षात घेऊन आपल्याकडील उपलब्ध असलेला पंप तात्पुरता बसवून पाण्याची गैरसोय दूर केल्याने त्यांचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.