नवी दिल्ली : राज्यपालांची भूमिका जनता आणि सरकारसाठी ‘मित्र, द्रष्टा आणि मार्गदर्शका’च्या स्वरुपात असावी अशी कल्पना घटनेच्या निर्मात्यांनी केली होती, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी केले आहे. राज्यपालांनी राज्यांमध्ये अधिकाधिक वेळ देण्यासह जनतेसोबत संबंध प्रस्थापित करण्याची सूचना त्यांनी राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या एकदिवसीय संमेलनाला संबोधित करताना केली आहे.
राज्यातील लोकांचे कल्याण आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहात, हे स्मरणात ठेवा. जनतेमधील जागरुकता वाढविणे आणि राष्ट्रीय उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी लोकांची भागीदारी सुनिश्चित करण्यात राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे उद्गार कोविंद यांनी काढले आहेत. या संमेलनात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाग घेतला आहे.
लोकशाहीत आम्हा सर्वांनी जनतेसोबत ‘निरंतर संपर्क’ ठेवायला हवा. सर्व राज्यपाल आणि उपराज्यपालांनी काही कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हय़ांच्या ग्रामीण क्षेत्रांचा दौरा केलेला असेल असा विश्वास असल्याचे कोविंद यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महामारीविरोधातील देशाच्या लढाईचे कौतुक करत राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या भूमिकेला अधोरेखित केले आहे.