प्रतिनिधी/ बेळगाव
मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या लक्ष्मीव्रताची सांगता गुरुवारी झाली. आपल्या घरी सुख-समृद्धी आणि वैभव नांदावे, यासाठी ही पूजा केली जाते. या व्रताला किंवा पूजेला वैभवलक्ष्मी पूजा, असेही म्हटले जाते.
शेवटच्या गुरुवारी व्रत करणाऱया स्त्रियांनी पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवून नवीन वस्त्र ठेवले. वस्त्रावर गहू किंवा तांदूळ यांची रास ठेऊन त्यावर कलश ठेवला. या कलशामध्ये दुर्वा, पैसे, सुपारी, अक्षता व हळकुंड ठेवण्यात आले. आंब्याची पाने कलशात ठेवून त्यावर दुसरा कलश ठेवून त्यालाच लक्ष्मीसमान मानले गेले.
व्रत करणाऱया महिलांनी दिवसभर उपवास करून सायंकाळी लक्ष्मीला नैवेद्य दाखविला. सायंकाळी परिचित सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी-कुंकू देऊन वैभवलक्ष्मी कथेच्या पुस्तिकेसह सौभाग्य वाण देण्यात आले. या पूजेच्या निमित्ताने बाजारपेठेत आंब्याची पाने, फुले, फळे, लक्ष्मीचे मुखवटे, व्रताच्या पुस्तिका आदी साहित्य दाखल झाले होते.