विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांची माहिती : आणखी आठ महिने प्रतीक्षा करावी लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे काम मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. सध्या हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. पण येत्या मार्च अखेरपर्यंत हा उड्डाणपूल खुला करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत असल्याची प्रतिक्रिया हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी ट्वीट करून दिली आहे.
शहरातील विविध रेल्वे फाटकांवर उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव रेल्वे खात्याने तयार केला आहे. यापूर्वी 3 ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करून दीड वर्ष उलटले. पण अद्यापही हे काम अर्धवट आहे. ठिकठिकाणी पुलाची बांधणी करण्यात येत आहे. तसेच रॅम्प बनविण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना व स्थानिक रहिवाशांना धोकादायक बनले आहे. लॉकडाऊन कालावधीत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. तसेच सध्या उड्डाणपुलाचे काम कुर्मगतीने सुरू असल्याने हे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या
सध्या तिसऱया रेल्वेगेटच्या कामामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करून रेल्वेफाटकावर होणारी गर्दी कमी करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत तक्रारी वाढत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाबाबत हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी ट्वीटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उड्डाणपुलाचे काम कोरोनामुळे रखडले होते. हे काम सुरू करण्यात येणार असून सप्टेंबरमध्ये रेल्वेमार्गावरील गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येईल. आर्थिक वर्षात म्हणजेच मार्चपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती ट्विट करून दिली आहे. त्यामुळे उड्डाणपूल खुला होण्यासाठी नागरिकांना आणखी आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.