एकुण 55 बळी, चोवीस तासात 4 मृत्यू : एप्रिलचा महिनाही काळजीचा लस पुरवठा झाल्याने लसीकरण सुरळीत,144 डिस्चार्ज
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या दुसऱया लाटेत मार्च महिन्यातील संसर्गाने जिल्हय़ाला झटका दिला आहे. मार्चमध्ये अचानक रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून एकुण 7 हजार 69 रूग्णांची नोंद एका महिन्यात झाली आहे. एकुण 55 मृत्यू झाले असून एप्रिलच्या पहिल्याच दिवशी 500 वर रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एप्रिलचा महिनाही काळजी वाढवणारा ठरणार आहे. दरम्यान, मार्चअखेर लसीचा तुटवडा जाणवत होता. मात्र रात्री जिल्हय़ाला लस उपलब्ध झाल्याने गुरूवारपासून लसीकरण सुरळीत झाले आहे.
पहिल्याच दिवशी 532 रूग्णवाढ
एप्रिलच्या पहिल्याच दिवशी आलेल्या अहवालात 532 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे अजूनही वाढणारे असण्याची शक्यता असून एप्रिल महिनाही काळजी वाढवणारा ठरणार आहे. या अहवालानुसार सातारा तालुक्यात 97 तर फलटणला 92 रूग्णांची वाढ झाली आहे. खटावला 53, वाईत 49, कराडला 35, महाबळेश्वर 35, जावलीत 24, खंडाळा 39, पाटण 15, माण 20, कोरेगाव 30 अशी रूग्णवाढ झाली आहे. हे आकडे पाहता एप्रिलमध्ये आकडा आणखी वाढण्याचे संकेत आहेत.
मार्चमध्ये पुन्हा जिल्हय़ाला फटका
नोव्हेंबर महिन्यापासून जिल्हय़ात कोरोनाचा आलेख मंदावत होता. त्यात फेब्रवारीपासून पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मार्चमध्ये दुसऱया लाटेत संक्रमण मोठय़ा प्रमाणात वाढले. मार्चमध्ये जिल्हय़ात एकुण 7 हजार 69 रूग्ण वाढले आहेत. तर मृत्यू 55 झाले आहेत. कोरोनामुक्तीचा आकडा 4 हजार 571 इतका आहे. सक्रीय रूग्ण 2 हजार 443 इतके वाढले आहेत.
लस पुरवठा सुरळीत
जिल्हय़ात सुरु असलेल्या लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला असून आतापर्यंत दीड लाखावर नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. आता 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास गुरुवारपासून आरंभ झाला आहे. लसीचा तुटवडा आल्याने गेले दोन, तीन दिवस लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र, गुरुवारीच लसीचे 59 हजार डोस आले आहे. त्यामुळे लसीकरण गतीने होणार असून आता सुट्टीबरोबरच सर्व आरोग्य उप केंद्रांवर लस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली. गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हय़ाला मिळणारा लसीचा साठा आला नव्हता. त्यामुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. मात्र, गुरुवारीच जिल्हय़ासाठी 59 हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे.
144 नागरिकांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 144 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
चार बाधितांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यात 4 मृत्यूंची नोंद होण्याची पहिलीच वेळ आहे. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदरबझार येथील 58 वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील 65 वर्षीय पुरुष, मोरवे (ता. खंडाळा) येथील 72 वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पिटलमध्ये करंजे (पुणे) येथील 57 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
- एकूण बाधित 532
- एकूण मुक्त 144
- एकूण बळी 04
- गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
- एकूण नमुने -406322
- एकूण बाधित -66063
- घरी सोडलेले -60361
- मृत्यू -1910
- उपचारार्थ रुग्ण- 3792