उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे उद्गार : लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलो, आज रस्त्याच्या कामाचा होणार प्रारंभ
प्रतिनिधी / काणकोण
खोतीगाव पंचायतीमधील नडके वाडय़ावरील रस्ता, उंच डोंगरमाथ्यावर राहणाऱया केरी वाडय़ावरील लोकांना रस्ता, वीज आणि पाणीपुरवठा करणे आणि पैंगीण पंचायतीमधील मार्ली वाडय़ावर जायला रस्ता तयार करून देणे हे आपले स्वप्न होते. त्यातील नडके वाडय़ावर जायला लागणारा रस्ता आणि पदपूल यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तर मार्ली वाडय़ावरील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज 17 रोजी होत असल्याने आपल्याला अत्यंत समाधान होत आहे. ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासास आपण पात्र ठरलो आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप शिकस्त करावी लागली. त्याचबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यावर विश्वास ठेवून सर्व कामांना मंजुरी दिली म्हणूनच हे साध्य होऊ शकले आहे, अशी प्रतिक्रिया काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
काणकोणच्या राजकारणात आपण कित्येक चढ-उतार पाहिले. सुरुवातीला पैंगीण मतदारसंघातून अपक्ष, त्यानंतर काँग्रेस, भाजप यांच्या चिन्हांवर आपण निवडणूक जिंकलो. कित्येक निवडणुका हरलो. परंतु माघार घेतली नाही. म्हणूनच 2017 च्या निवडणुकीत माजी मंत्री रमेश तवडकर आणि माजी आमदार विजय पै खोत यांच्याविरुद्ध उतरलेलो असताना केवळ मतदारांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला त्यामुळे निवडणूक जिंकलो, असे फर्नांडिस म्हणाले. यंदा आपण गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. संपूर्ण काणकोण मतदारसंघाचा विचार करताना 1989 पर्यंत स्व. गणबा देसाई आणि स्व. मंजू देसाई यांचा 15 वर्षांचा कालखंड, त्यानंतर स्व. वासू पाईक गावकर यांचा 17 वर्षांचा कालखंड, पैंगीण आणि काणकोण असे दोन मतदारसंघ झाल्यानंतर जगदीश आचार्य यांनी पाच वर्षे आणि त्यानंतर रमेश तवडकर यांनी 12 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मार्ली वाडय़ावर केला होता वीजपुरवठा
आपण ज्यावेळी पैंगीण मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी दिगंबर कामत वीजमंत्री होते. त्यावेळी पहिल्यांदा मार्ली वाडय़ावर आपण वीज नेली. ज्यावेळी माजी पंच कुष्टा गावकर यांच्या घरातील एका वृद्ध महिलेने रॉकेलचा दिवा विझविला आणि विजेवरील दिवा पेटविला त्यावेळी त्या घरातील वृद्ध महिलेच्या तोंडावर उमटलेले हास्य आपण कधीच विसरू शकणार नाही असे सांगताना फर्नांडिस काही क्षण भावूक झाले. शहरातील लोकांना 24 तास पाणी मिळते. मग काणकोणसारख्या भागात पाण्यासाठी वणवण का करावी लागते. या भागात अखंडित वीजपुरवठा का नसावा, सुसज्ज रस्ते का तयार होऊ नयेत हा आपल्याला सतावणारा प्रश्न आहे आणि त्यावर आपण अधिक भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
मार्ली वाडय़ावरील नागरिकांनी रस्त्याची मागणी करत मागच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्या प्रकाराला एक राजकारणी या नात्याने आपण प्रोत्साहन देऊ शकत नसलो, तरी अशा प्रकारचा बहिष्कार ही पहिलीच घटना होती. न्याय्य हक्कांसाठी या नागरिकांनी पुकारलेला तो सामूहिक लढा होता आणि त्यामुळेच या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी या वाडयावर भेट देऊन ग्रामस्थांची मते आजमावून घेतली. लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न केला. आपणही वैयक्तिकरीत्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अभयारण्याच्या जांचक नियमांखाली हा वाडा भरडला जात होता. आधुनिक जगाचा सामना करणाऱया नवीन पिढीला रस्ता नसल्यामुळे शाळा, कॉलेजात जाताना पायपीट करावी लागत होती. ही समस्या आता सुटणार आहे, असे मत फर्नांडिस यांनी व्यक्त केले. सरकारने जे काही निर्बंध घालून दिलेले आहेत त्यांचे पालन मात्र जुन्या आणि नव्या पिढीने करायला हवे. अतिरेक टाळून सर्व गोष्टी करायला हव्यात, असे ते म्हणाले.