मुख्याधिकाऱयांना उपनगराध्यक्षांचा इशारा
‘सीओं’च्या मनमानीमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान!
अग्निशमन बंबाचा प्रश्न कधी मिटणार?
प्रतिनिधी / मालवण:
सक्शन वाहन दुरुस्ती, सागरी महामार्गावर निर्माण करण्यात आलेले डंपिंग ग्राऊंड यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचा मनमानीपणा समोर येत आहे. या सर्वांमुळे मालवण पालिकेचे आर्थिक नुकसान होत असून शहरवासियांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. मुख्याधिकाऱयांना बदली करून घ्यायची असेल, तर त्यांनी खुशाल करून घ्यावी, मात्र जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देत उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी मुख्याधिकारी यांच्या कारभारावर टीका केली आहे.
उपनगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत वराडकर बोलत होते. यावेळी आरोग्य सभापती पूजा सरकारे, गटनेते गणेश कुशे आदी उपस्थित होते.
सक्शन वाहनाचे काय झाले?
मालवण पालिकेने वर्षभरापूर्वी खरेदी केलेले सक्शन वाहन नादुरुस्त झाल्याने तीन महिने ठेकेदाराच्या प्रतीक्षेत पालिका प्रशासनाने घालविले होते. यानंतर आता दुरुस्तीसाठी वाहन ठेकेदार एजन्सी घेऊन गेल्यानंतर महिनाभर परत आलेले नाही. आता तर ठेकेदाराने वाहन दुरुस्तीचा खर्च पालिकेकडे मागितल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराचे दुखणे पुढे आले आहे. सक्शन वाहन नसल्याने शहरवासियांनी मागणी करूनही शौचालयांचा मैला काढण्यात येत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत आरोग्य सभापती यांनीही अनेकदा मुख्याधिकाऱयांना कल्पना दिली होती. त्यावेळी त्यांनी ठेकेदार एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले. त्यावरही काहीही न झाल्याने गाडी अडकून पडली आहे. त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार आहेत, असाही आरोप वराडकर यांनी केला.
नवीन कचरा डंपिंग ग्राऊंड बनविले!
सागरी महामार्गावरील लोकवस्तीच्या ठिकाणी जमीन मालकाने प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यासाठी पालिकेला जागा उपलब्ध करून दिली होती. तरीही शहरातील सर्वच कचरा प्रक्रिया न करता, थेट लोकवस्तीच्या ठिकाणी टाकण्यात आला होता. जनतेने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पुन्हा पालिकेचे आर्थिक नुकसान होऊन तो कचरा पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी, पालिकेच्या गाडय़ा आणि पालिकेचा पैसा खर्च झालेला आहे. त्याला जबाबदार असणाऱया अधिकाऱयांवर कारवाई होणे आवश्यक आहे. जनतेला त्रास होण्यासारखे प्रकार मुख्याधिकाऱयांना माहिती असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वराडकर यांनी केला. दरम्यान, आरोग्य सभापती पूजा सरकारे यांनी आपल्यालाही याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. हा कचरा लोकवस्तीत टाकण्यात आल्याबाबत आपण मुख्याधिकाऱयांना चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे तसेच याला जबाबदार असणाऱयांकडून पैशांची वसुली करावी, असेही स्पष्ट केल्याचे सभापतींनी सांगितले.
बंब प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता नाही!
शहरात काही दिवसांपूर्वी तीन ठिकाणी आगी लागल्या होत्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून मिळेल तशा आगी विझविल्या. मात्र, पालिकेचा बंब अद्याप न आल्याने जनतेची गैरसोय होत आहे. याबाबत आपण आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने आता अग्निशमन बंबाचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने मालवणवासियांची सुरक्षितता रामभरोसे आहे. त्याला सर्वस्वी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी जबाबदार आहेत. बंब नसल्याने पर्यायी व्यवस्थाही पालिकेने उभी न केल्याने पालिकेचा कारभार हा मनमानीपणे चालल्याचे स्पष्ट होत आहे, असेही वराडकर म्हणतात.
पालिकेत लुटूपूटूचा खेळ सुरू!
पालिकेत सध्या लुटूपूटूचा खेळ सुरू आहे. नगराध्यक्ष मुख्याधिकाऱयांना, तर मुख्याधिकारी नगराध्यक्षांना पत्र पाठविण्याचा खेळ खेळत आहेत. नगराध्यक्षांच्या काही पत्रांना तर मुख्याधिकारी उत्तरही देत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱयांना याठिकाणी काम करायचे नसेल, तर आमचा काहीही प्रश्न नाही मात्र जनतेला त्रास होईल, असे वागत असाल, तर आम्ही खपवून घेणार नाही, असेही वराडकर म्हणाले.