साहित्य : अर्धा किलो ओले सोललेले काजू, 1 कांदा उभा चिरून, 2 बटाटे छोटे तुकडे करुन, पाव वाटी तेल, 1 चमचा हळदपूड, 3 चमचे मालवणी मसाला, वाटणासाठी ः 2 कांदे चिरून, अर्धी वाटी ओलं खोबरं खिसून, अर्धी वाटी सुकं खोबरं खिसून, अर्धा इंच आलं, 4 लसणाच्या पाकळय़ा, अर्धा चमचा बडीशेप, 3 ते 4 काळीमिरी, 3 लवंग, छोटा तुकडा दालचिनी, 1 दगडफूल, थोडी खसखस, 2 तमालपत्र, चवीपुरते मीठ
कृती : गरम तेलावर कांदा तांबूस रंगावर भाजावा. नंतर ओलं-सुकं खोबरंही स्वतंत्ररित्या भाजावे. सुकं खोबरं भाजताना त्यातच आलं-लसूण आणि इतर मसाला टाकावा. सर्व मसाला गार करून मिक्सरला लावावा. कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. नंतर त्यात हळदपूड, मालवणी मसाला आणि मिक्सरला लावलेला मसाला टाकून परतवावा. कडेने तेल सुटले की त्यात पाणी ओतावे. नंतर काजू आणि बटाटय़ाचे तुकडे टाकून मिक्स करावे. एक उकळी आली की वरून मीठ टाकावे. तयार काजू करी भातासोबत द्या.