रांची : झारखंडमधील साहिबगंज येथून पश्चिम बंगालमधील मालदा येथे पोहोचलेल्या मालवाहू जहाजाला सोमवारी जलसमाधी मिळाली. गंगा नदीत घडलेल्या या दुर्घटनेनंतर काही लोक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मालवाहू जहाजातून दगडांनी भरलेले ट्रक नेले जात होते. त्यामुळे एकूण 8 ट्रकसह त्यातील सर्व दगडही पाण्यात बुडाले आहेत. मदत व बचावकार्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये फेरी सेवा बंद करण्यात आली. तथापि, मालवाहू जहाजांवर कोणतेही बंधन घातले गेले नव्हते. प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त जहाज साहिबगंज जिल्हय़ातील राजमहल येथून दगड घेऊन पश्चिम बंगालकडे जात होते.
याच प्रवासावेळी गंगा नदीत जहाज बुडाले. जहाजात एका बाजूने लोडिंग झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत जीवितहानीचा आकडा स्पष्ट झाला नव्हता.