सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यात ब्रिटीशांच्या काळात बांधलेल्या मालशे पुलाचे भवितव्य धोक्यात आले आहे. या पुलाचा नैसर्गिक स्रोत खुला करण्यात यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी दिला आहे.
अमित शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक असा मालशे पुल अनाधिकृतपणे बंदीस्त करताना शहर विकास विभागाचा या कामासंदर्भात कोणतीही परवानगी अथवा अभिप्राय न घेता बेकायदेशीरपणे पालिकेत अधिकारी व नगरसेवक तसेच मालशे पुलाच्या शेजारील जागेचा खासगी बिल्डर यांनी संगनमत करुन जिल्हाधिकारी सातारा व शासनाची आर्थिक फसवणूक करुन शासनाच्या 51 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केला. तसेच खासगी बिल्डरच्या जागेला बांधकाम करण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी मालशे पुल बंदिस्त करुन बिल्डरचा आर्थिक फायदा करुन दिला. याबाबत वारंवार पालिकेचा व जिल्हा प्रशासनाला योग्य कागदपत्रे व पुरावे, फोटोसह तसेच लेखी तक्रारी करुन सुद्धा या संबंधितांवर कारवाई होत नाही. याची पूर्णत चौकशी करुन शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन ऐतिहासिक मालशे पूल खुला करुन पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्ववत करावेत, अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन छेडू, असा इशारा अमित शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे मालशे पुलाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.