पत्रकार मनीषा सुभेदार यांचे प्रतिपादन : हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
प्रतिनिधी / बेळगाव
मालिकांमध्ये रंगविली जाणारी स्त्रीची प्रतिमा ही आभासी आहे. स्त्री नेहमी कुटिल कारस्थान करणारी, सूडबुद्धीने वावरणारी अशी नसते किंवा नेहमी महान त्यागमूर्ती नसते. त्यामुळे केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे पहायला हवे. मात्र अलिकडच्या काळात स्त्रीचे कर्तृत्व, तिची क्षमता आणि तिची भरारी याची दखलही माध्यमे घेत आहेत, असे मत ‘तरुण भारत’च्या ज्ये÷ पत्रकार मनीषा सुभेदार यांनी व्यक्त केली.
हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनि÷ महाविद्यालयामध्ये ‘अंतर्गत तक्रार समिती’ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात शिक्षण दिन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल गवळी होते.
मनीषा सुभेदार म्हणाल्या, पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. तानुबाई बिर्जे यांनी दिनबंधू या वृत्तपत्राचे संपादक पद सांभाळले. त्यांच्यापासून पुढे पत्रकारितेत महिलांची मोठी परंपरा सुरू झाली. माध्यमांमध्ये विविध स्वरुपात स्त्रियांचे चित्रण केले जाते. परंतु चित्रपटामध्ये प्रामुख्याने ती सोशीक अथवा शोभेची बाहुली दाखविली जाते. मालिकांमध्ये तिचे होणारे चित्रण हे आभासी आहे. रिमोट पेक्षकांच्या हातात आहे. असे समर्थन करून भागणार नाही. कारण प्रेक्षकांकडून प्रतिसाद, मानसन्मान, प्रसिद्धी कलाकारांना मिळते. तर या क्षेत्राशी त्यांची बांधिलकी सुद्धा नक्कीच आहे. त्यामुळे मालिकांमधून होणारे स्त्रीचे चित्रण बदलायला हवे.
कर्तृत्वाने ठसा उमटविणे महत्त्वाचे
विद्यार्थीनींनी आपल्याला नेमके काय करायचे आहे हे ठरविले पाहिजे. लक्षवेधी दिसण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हे कोणत्याही शस्त्रापेक्ष महत्त्वाचे शस्त्र आहे हे मुलींनी लक्षात घ्यायला हवे, असे त्या म्हणाल्या. प्राचार्य अनिल गवळी यांनी शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे. त्यामुळे प्रथम शिक्षण पूर्ण करणे यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जे. एम. उत्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जे. जे. व्हटकर यांनी केले. ग्रंथपाल वंदना केळकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. आर. एच. काझी यांनी आभार मानले.