भाजप प्रदेश मागासवर्गीय मोर्चाचे अध्यक्ष एन. एल. नरेंद्रबाबू यांना निवेदन
प्रतिनिधी/ अथणी
माळी-मालगार समाज मागास असून सरकारने निगम किंवा महामंडळ स्थापन करून समाजाच्या विकासासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी अथणी माळी-मालगार समाजाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवदेन भाजप प्रदेश मागासवर्गीय मोर्चाचे अध्यक्ष एन. एल. नरेंद्रबाबू यांना येथील सरकारी विश्रामधाम येथे देण्यात आले.
निवेदन स्वीकारून नरेंद्रबाबू म्हणाले, कर्नाटकात माळी-मालगार समाजाची लोकसंख्या 40 ते 45 लाखांहून अधिक आहे. आजही ते शेती आणि त्यावर आधारित जोड उद्योग यावर अवलंबून आहेत. त्यामुळे ते राजकीय, आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा खूपच मागास आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी तत्काळ महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे, ही बाब आपण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या निदर्शनास आणून देऊ. तसेच माळी-मालगार समाजाने संघटित राहून आपल्या मागणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना समाजाचे नेते संतोष बडकंबी यांनी, उत्तर कर्नाटकात माळी समाज मोठय़ा संख्येने असून त्यांच्या विकासासाठी सरकारने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी केली. याप्रसंगी बसवराज गुमटे, अरुण भासंगी, परशुराम सोनकर, मल्लेश हुद्दार, रमेश कागले, गिरीश दिवाणमठ, महांतेश माळी, रवी बडकंबी, बसवराज हळदमळ, मल्लिकार्जुन बाळीकाई, जगदीश किवड, रवी बकारी, सुभाष माळी, अशोक लिंबिगिडद, महादेव चमकेरी, प्रशांत तोडकर, रमेश माळी आदी उपस्थित होते.