प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील मावळंगे-थुलवाडी येथील उलटय़ा-जुलाबाच्या साथीने 2 जण दगावल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे. या साथीची दाखल घेत आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत 14 जणांना औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. मात्र ही साथ कशामुळे उद्भवली याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून त्या भागात घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाचे काम हाती घेतल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.
या साथीच्या पार्श्वभूमीवर मावळंगे येथील मंगेश थूळ या तरूणाचा 10 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच भागातील भातकापणीच्या कामासाठी गेलेल्या शालिनी थूळ यांचाही आजारपणामुळे औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे त्या परिसरात नागरिकांत मोठी घबराट पसरलेली. हा आजाराचा प्रार्दुभाव नेमका कशामुळे झाला याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे त्या परिसरातील मृतांच्या संपर्कात आलेल्या 14 ग्रामस्थांना बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेणेकेरून साथीचा अधिक प्रार्दूभाव होऊ नये याची खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे.
या साथीमुळे मृत झालेल्या मंगेश थूळ व शालिनी थूळ यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या आजारावर शिक्कामोर्तब होणार आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षाचे काम हाती घेतले आहे. लोकांना त्याबाबत जनजागृती व खबरदारीचे आवाहन करण्यात येत असल्याचे डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले आहे.