मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले राज्यातील दुर्गप्रेमींना आदेश
प्रतिनिधी / सातारा :
छातीचा कोट करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात साडेतीनशेहून अधिक किल्ले उभे केले. या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. याकरता सुक्ष्म आराखडा तयार करुन प्रत्यक्ष काम केले गेले पाहिजे. गडकिल्ल्यांवर नेमके काय आहे, याची माहिती देणारे संग्रहालय प्रत्येक गडाच्या खाली असणे आवश्यक आहे. टप्याटप्याने गडसंवर्धनाची कामे केली जातील. पहिल्या टप्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदूर्ग, विजयदुर्ग आणि सुधागड या पाच किल्यांचा समावेश असून, दुर्गप्रेमींनी दुर्ग संवर्धनाच्या कार्याला सुरुवात करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झुम मिटींगद्वारे दुर्गप्रेमींना आदेश दिले.
रविवारी दुपारी 12.30 वाजता राज्यातील 27 जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक दुर्गप्रेमींची झुम मिटींग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. या मिटींगचे सुत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केले. यामध्ये दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी, पांडुरंग बलकवडे, उमेश झिरपे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, अद्वैत प्रभावळकर, वास्तल्य फौंडेशनचे शशिकांत पवार, धर्मवीर युवा मंचचे संस्थापक प्रशांत नलावडे, यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील गडकोटांचे सवंर्धन व्हावे, यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशेहून अधिक गडकोट उभे केले. मावळ्यांनी छातीचा कोट करुन ते राखले. त्याच गडकोटांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे. परदेशात जसे फोर्ट असतात, त्या पद्धतीने नाही. परंतु आपल्या गडकोटावर जी माहिती आहे, जी ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांची माहिती एकत्रीत देण्याकरता असे गडाच्या पायथ्याला छोटेसे संग्राहालय असावे. प्रत्येक गडाच्या संवर्धनासाठी एक टीम कार्यरत असावी. त्या टीममध्ये वनस्पतीप्रेमी, पक्षीप्रेमी यांचाही समावेश असावा, जेणे करुन कास पुष्प पठारावर नैसर्गिक विविधता आढळून येते तशी काही गडावर असू शकते. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला गडकोटांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी संवर्धन होणे गरजे आहे. त्याकरता आपण टीमवर्कने काम करुयात. पहिल्या टप्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुधागड घेवूयात. नुसत्या गप्पा गोष्टी नकोत तर प्रत्यक्ष काम करुयात. आराखडा तयार करुन पुढची बैठक घ्या. अडीअडचणीचा पाढा नको तर सोडवणूकचा पाढा हवा, आता काम करायचे आहे. प्रत्येकाने संवर्धन करायचे आहे. टप्याटप्याने कामे होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दुर्ग संवर्धनासाठी राज्यस्तरीय समिती व्हावी
दुर्ग संवर्धनासाठी स्वतः मुख्यमंत्री सक्रिय झाल्याने सर्व दुर्गप्रेमींच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करतो. मात्र, केवळ उच्चतंत्र वापरून यावर चर्चा होण्यापालिकडे संवर्धन करणाऱ्या संस्थांना बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी अश्या संस्थांची राज्यस्तरीय समिती आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावर काम करणाया संस्था आहेत त्यांची साखळी निर्माण करून त्या-त्या संस्थांच्या माध्यमातूनच हे घडू शकते. राज्य शासनाने उचललेल्या या पावलाला पक्ष, संस्था अश्याभेदांच्या पुढे जाऊन दुर्गप्रेमी सहकार्य करतील.
– दीपक प्रभावळकर, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती, राजधानी सातारा.
वासोटा आणि भैरवगडाचा पर्यटनांमध्ये समावेश व्हावा
राजधानी साताऱ्याच्या वैभवात भर टाकणारे आणि सद्या दुर्लक्षित असणारा किल्ले वासोटा आणि महाराष्ट्राची वरदायिनी असणाऱ्या कोयना जलाशयाच्या समोर असणारा किल्ले भैरवगड यांचा समावेश पर्यटनामधे व्हावा. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराखाली एक समिती स्थापन व्हावी. नाहीतर ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना प्रशासन काम करू देत नाही, अशी मागणी या बैठकीत धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी केली आहे. तर वास्तल्य फौंडेशनचे शशिकांत पवार यांनी छ. संभाजी महाराज यांचे सुपुत्र छ. शाहुमहाराज आणि राणी ताराराणी बाईसाहेब यांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराकड़े प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.