कुटबणजेटीवरीलट्रॉलरमालकांचीमागणी
प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
राज्य सरकारने सध्या मासेमारीवर बंदी आणली असून ही बंदी उठवून पूर्ववत मासेमारी करायला व माशांची विक्री करायला सरकारने अनुमती द्यावी. यामुळे सध्या माशांच्या बाबतीत जी लोकांची आबाळ व्हायला लागली आहे ती दूर होईल आणि ट्रॉलरमालकांनाही ते दिलासादायक ठरेल, अशी मागणी कुटबण येथील ट्रॉलरमालकांकडून होऊ लागली आहे. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याचे प्रयत्न ट्रॉलरमालकांकडून चालू असून लवकरच त्यांची भेट घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सध्या मासळीची आवक घटली असून मासळी बाजार बंद असल्याने खवय्यांची गोची होऊ लागली आहे. कुटबण जेटीवर सुमारे 350 लहान-मोठे ट्रॉलर्स असून या सर्वांवर मिळून अंदाजे 3500 कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत. मासेमारी बंद करून ट्रॉलर नांगरून ठेवावे लागले, तर हे सारे कामगार या भागात परततील. उत्पन्न बंद असताना या कामगारांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न सध्या बोटमालकांसमोर येऊन पडला आहे.
यावर तोडगा म्हणून मासेमारी करण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे सदर कामगार पकडलेली मासळी जेटीवर उतरल्यानंतर आवश्यक जिन्नस, पाणी घेऊन परत रवाना होतील. मासेमारीदरम्यान ते बराच काळ खोल समुद्रात राहत असल्याने कुणाला समस्या भेडसावणार नाही, असे ट्रॉलरमालकांचे म्हणणे आहे.
मासेमारी, मासेविक्रीलाही परवानगी द्यावी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत लोकांची गैरसोय होऊ लागली होती. त्यामुळे सरकारने नंतर निर्बंध शिथील करून किराणामालाची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. त्यानंतर भाजीपाल्याचे गाळेही उघडे ठेवण्यास अनुमती दिली गेली. त्याचप्रकारे मासेमारी करण्यास व मासळीची विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कुटबण येथील बोटमालकांनी केली आहे.
आवश्यक खबरदारी घेण्याची तयारी
मासे हा गोमंतकीयांच्या दृष्टीने आहारातील मुख्य घटक आहे. त्याच्या अभावी गोमंतकीयांची परवड होऊ लागली आहे. त्यामुळे ही सोय करण्याच्या दृष्टीने सरकारने विचार करावा. परराज्यांतील भाजीपाल्याची वाहने गोव्यात येऊन त्याची विक्री फलोत्पदन महामंडळाच्या गाळय़ांवर करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. त्याचधर्तीवर कुटबण जेटीवर उतरविली जाणारी मासळी नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था प्रशासनाने करावी आणि सदर मासळी विविध ठिकाणे निश्चित करून त्या जागी त्यांची विक्री करावी, अशी मागणी ट्रॉलरमालकांनी केली आहे.
ही विक्री करताना कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने जी खबरदारी घेणे आवश्यक आहे ती घ्यावी. स्वच्छतेच्या दृष्टीने आणि इतर जी काही खबरदारी घ्यायची आहे ती घेण्यास ट्रॉलरमालक तयार आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळून किराणामाल व भाजीपाल्याची विक्री होत असेल, तर माशांची का नाही असा सवाल मच्छीमारांबरोबर लोकही करायला लागले आहेत.
तुटवडय़ामुळे दर भडकले
सध्या कुंकळ्ळी, असोळणा, बाळ्ळी, वेळ्ळी, फातर्पा भागांमध्ये सायकलवरून फिरून मासेविक्री करणाऱया विक्रेत्यांमुळे लोकांची काही प्रमाणात सोय होऊ लागली असली, तरी हे प्रमाण खूपच कमी आहे. समुद्रात यापूर्वी गेलेले ट्रॉलर कुटबण जेटीवर येऊन जी मासळी उतरवितात तीच लोकांपर्यंत पोहोचत आहे. मात्र मासे बाजारात उपलब्ध नसल्याने खूप महाग दराने ही मासळी लोकांना घ्यावी लागत आहे.