प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 100 रुपये, थुंकल्यास 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आज दिले.
ग्रामीण भागातील दुकानदार तसेच व्यावसायिक यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे बंधनकारक असून मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्यास 500 रूपयांचा दंड आकारला जाईल, तर फिरते फळ व भाजी विक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्यास 200 रूपये दंड आकारला जाणार आहे. संबंधितावर एकदा दंड झाल्यानंतर दुसऱ्यांदा या नियंमाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्या व्यक्तीकडून दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही दंड करण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय-योजनेची अंमलबजावणी कटाक्षाने करावी, असे निर्देश देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले की, या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 45 अन्वये अनुसूची 1 (ग्रामसूची) मधील 24 व 25 च्या तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी आपले अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. याकामी कोणतीही हायगय करु नये असा इशाराही मित्तल यांनी दिला.
तर या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, महाराष्ट्र कोव्हिड -19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्याबाबत जिल्हयातील सर्वच गट विकास अधिकाऱ्यांनी अधिनस्त ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही मित्तल यांनी केली आहे.