प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हय़ातील 305 स्वयं-सहाय्यता समुहाने लॉकडाऊनच्या काळात 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती केली. केवळ निर्मिती करून न थांबता 71 लाख 35 हजार 16 रूपये किंमतीला या मास्कची विक्री करून कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये कागलमधील समुहाने सर्वाधिक म्हणजे 2 लाख 42 हजार 10 मास्कची निर्मिती करून विक्री केली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य या स्वयं-सहाय्यता समुहांना मास्क निर्मितीसाठी लाभले आहे.
22 मार्च रोजी जनता कर्फ्यू सर्व प्रथम झाला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात लॉकडाऊनला सुरूवात झाली. या लॉकडाऊनच्या काळात घराघरात नवनवे उपक्रम, विशेषतः खाद्यपदार्थांच्या निर्मितीवर भर राहिला आहे. पण तो कुटूंबातील सदस्यांसाठी मर्यादित असेल. बदलत्या काळाची पावले ओळखत त्याच पध्दतीने स्वतःमध्ये बदल घडवण्याचे काम स्वयं-सहाय्यता समुहातील महिलांनी केले आहे. बाजारातील मागणी आणि पुरवठा याचे गणित समजावून घेत महिला सदस्यांनी लॉकडाऊनचा उत्तम फायदा करून घेतला. 64 दिवसात मिळालेल्या संधीचं सोनं करत 305 स्वयं-सहाय्यता समुहातील 1301 महिला सदस्यांनी 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती केली असून 71 लाख 35 हजार 16 रूपयांना याची विक्री झाली आहे.
तालुकानिहाय स्वंय सहाय्यता बचत गटा
आजरा 12
भुदरगड 150
चंदगड 15
गडहिंग्लज 17
बावडा 11
हातकणंगले 12
कागल 17
करवीर 16
पन्हाळा 14
राधानगरी 16
शाहूवाडी 13
शिरोळ 12
एकूण 305
आम्हीही योद्धा ठरतोय हा संदेश देण्याचा प्रयत्न
बाजारात उपलब्ध झालेली गरज, असणारी मागणी आणि आलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या युध्दात महिलांनीही लावलेला हातभार यशस्वी ठरतोय. आम्ही महिलाही मागे नाही, योध्दे ठरतोय असाच काहिसा संदेश जिह्यातील या महिलांनी स्वकर्तृत्वाने दिला आहे. हा संदेश या निमित्ताने दिला आहे.
प्रशांत सातपुते – जिल्हा माहिती अधिकारी