बेळगाव /प्रतिनिधी
कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्याची सूचना प्रशासनाकडून सातत्याने करण्यात आली आहे. परंतु त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मास्कचा वापर टाळणाऱया मंडळींची संख्याही मोठी आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेश कार्यवाहीसाठी पोलिसांनी देखील आता कंबर कसली आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल काळात देखील मास्कसाठी लाठीचा प्रसाद खाण्याची वेळ नागरिकांवर आली.
बुधवारी सकाळी अनेक नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. पोलिसी कारवाईचा बडगा पाहून अनेक दुचाकीस्वारांनी दुचाकी दामटून पुढे नेण्याचा प्रकार केला. या सर्व प्रकारांमध्ये मास्कच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. आरोग्य संचालनालयाने मास्कची सक्तीही नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पोलिसांकडून मास्कसाठी आता बडगा उगारण्याचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.