ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप, सोमय्यांना न्यायलयात खेचणार, दीडशे कोटींचा दावा ठोकणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
बिनबुडाचे आरोप करुन मला नाहक बदनाम करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत असून हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेच षडयंत्र आहे. या संपूर्ण प्रकरणा मागे तेच मास्टरमाईंड आहेत. असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ब्रिक्स कंपनीशी माझा आणि माझ्या जावयाचा कसलाही संबंध नसल्याचा खुलासा केला. चंद्रकातं पाटलांनी आमच्या विरोधात पुरुषार्थासारखा लढावं. सोमय्यांच्या माध्यमातून माझी व कुटुंबांची बदनामी करून भाजपला काही मिळणार नाही. असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर मंत्री मुश्रीफ यांनी मुंबई येथे पत्रकार परिषत घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सोमय्या यांनी केलेल्या आरोपात कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे सांगितले.
आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांनी केलेला आरोप साफ चुकीचा आहे. अपुऱया माहितीच्या आधारे ते बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यांना चाप बसावा यासाठी कोर्टात तक्रार दाखल करणार आहे. शिवाय त्यांच्यावर आणखी 50 कोटी रुपयांचा मिळून एकूण 150 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपची ऑफर नाकारल्यानेच मला टार्गेट केलं जातयं
कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त केला. महापालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेतही भाजपची सत्ता नाही. हे सारे हसन मुश्रीफ यांच्यामुळे घडले. म्हणून भाजपची मंडळी मला टार्गेट करत आहेत. चंद्रकांत पाटलांनी मला भाजपात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण मी नकार दिला. त्या रागापोटी ते मला त्रास देत आहेत. असा आरोप केला.
महाविकास आघाडी अस्थिर करण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. या विरोधात सर्वांननी एकत्र येऊन लढण्याची भूमिका मंत्रीमंडळात मांडली आहे. भाजपच्या नेते मंडळीचा घोटाळा बाहेर काढू. चंद्रकांत पाटील यांनी रस्ते कामात केलेल्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार करणार आहे. त्यांचे अध्यक्षपद ही जाणार होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांच्या मैत्रीमुळे ते राहिले आहे.
सोमय्यांनी स्टंटबाजी थांबवावी
सोमय्यांच्या आरोपावर मुश्रीफ म्हणाले, `सोमय्यांनी जरुर तक्रारी कराव्यात. तक्रार केल्यावर चौकशी करायला यंत्रणा आहेत. पण त्यांनी घोटाळेबाज, तुरुंगाव पाठविणार अशी वक्तव्ये करू नयेत. ते काय न्यायाधीश आहेत का? त्यांनी आरोप केले, ईडीकडे तक्रार केल्याचे सांगतात. पण पुन्हा कोल्हापूर, कागल दौरा कशासाठी? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. त्यांनी स्टंटबाजी थांबवावी. शरद पवारांचे नाव घेऊ नये. या प्रकाराशी पवारांचा काही संबंध नाही. त्यांचे नाव घ्यायची सोमय्यांची लायकी नाही. असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.