मुख्य सचिवांना केंद्र सरकारने केले पाचारण
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम आणि मिझोरम यांच्यातील सीमा वादावरून झालेल्या हिंसक झटापटीच्या पार्श्वभूमीवर अद्याप स्थिती सुरळीत झालेली नाही. दोन्ही राज्यांच्या सीमेवर अद्याप तणाव आहे. बिघडलेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम सरकारने मिझोरमच्या सीमेवर 4 हजार जवान तैनात केले आहेत. याचबरोबर केंद्र सरकारकडून दोन्ही राज्यांमधील तणाव संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहता केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी बुधवारी आसाम तसेच मिझोरमचे मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांची बैठक आयोजित केली. या बैठकीत दोन्ही राज्यांमधील वाद संपविण्याच्या मार्गासंबंधी विचारविनिमय झाला आहे.
आसाम आणि मिझोरम यांच्यातील वाद चर्चा तसेच परस्पर सहकार्यातून सोडविला जाऊ शकतो. दोन्ही राज्यांमधील वाद सोडविण्यासाठी केंद्र सरकार मध्यस्थ म्हणून भूमिका बजावू शकते असे गृह मंत्रालयाकडून संसदेत सांगण्यात आले आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी इनर लाइन फॉरेस्ट रिझर्व्हमध्ये अतिक्रमणाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे.
वादावर तोडगा निघेपर्यंत मिझोरम सीमेवर 4 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येतील. आसामच्या एका इंच जमिनीवर शेजारी राज्याचे अतिक्रमण होऊ देणार नाही. झूम शेतीसाठी रस्त्यांची निर्मिती केली जात असून वेगाने जंगलतोड सुरू असल्याचे उपग्रहीय छायाचित्रांद्वारे स्पष्ट झाल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
सीमेनजीकच्या भागात सुरू असलेल्या कार्यांना अनुमती दिली जाऊ शकत नाही. जंगलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले.