नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज व अव्वल दर्जाचा ऑफस्पिनर रविचंदन अश्विन यांची प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. मितालीने मागील आठवडय़ातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 22 वर्षे पूर्ण केली. 38 वर्षीय मितालीने वनडे क्रिकेटमध्ये 215 सामन्यात 7170 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया अश्विनच्या खात्यावर 79 कसोटीत 413 बळी आहेत. तो सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत नसला तरी वनडेत 150 व टी-20 मध्ये 42 बळी त्याने नोंदवले आहेत.
याशिवाय, अर्जुन पुरस्कारासाठी अनुभवी डावखुरा फलंदाज शिखर धवनसह केएल राहुल, जसप्रित बुमराह यांची बीसीसीआय शिफारस करणार आहे. मागील वर्षी धवनकडे दुर्लक्ष केले गेले होते. 35 वर्षीय धवनने 142 वनडेत 5977 धावा केल्या. त्याने कसोटीत 2315 व टी-20 मध्ये 1673 धावांचे योगदान दिले आहे.