शाळा-महाविद्यालये, जीम बंद ठेवण्याची सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात पुढील दोन आठवडय़ात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ञांनी राज्य सरकारला दिला आहे. तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना हाती न घेतल्यास परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी तत्काळ दोन आठवडे शाळा, महाविद्यालये, जीम, जलतरण तलाव बंद करण्यासह मिनी लॉकडाऊन जारी करावे, अशी शिफारस कोरोना तांत्रिक सल्ला समितीने सरकारकडे केली आहे.
पुढील 10 दिवसात राज्यात दररोज 3,500 च्या वर कोरोना रुग्ण आढळून येण्याची शक्यता असल्याचा इशारा समितीने दिला आहे. एखाद्यावेळेस असे घडल्यास गेल्या वर्षीचीच पुनरावृत्ती होईल. बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात जागा मिळणे अशक्य होईल. त्यामुळे आताच कोरोना नियंत्रणासाठी पावले न उचलल्यास परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल. किमान दोन आठवडे राज्यभरात शाळा, महाविद्यालये, जीम, जलतरण तलाव बंद ठेवावेत. तसेच सभा, समारंभ, विवाह आणि यात्रांवर निर्बंध आणावेत. तसेच चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात यावा. बाजारपेठ, मॉल, मंदिरे, आदी ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करावे, असा सल्ला समितीने दिला आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरण्याची शक्यता असल्याने शुक्रवार दि. 19 रोजी रात्री समितीने महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान गेल्या दहा दिवसात राज्यात दररोज वाढ होत असलेल्या कोरोना रुग्णांबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. मार्चच्या पहिल्या दहा दिवसात दररोज किमान 350 ते 650 रुग्ण आढळून येत होते. पण त्यानंतरच्या दिवसात दररोज 750 ते 1,800 पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. 10 मार्च ते 20 मार्चपर्यंत एकूण 12,446 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याच प्रमाणात रुग्णांची संख्या वाढल्यास आणखी एक आठवडय़ात 2,500 रुग्ण आणि त्यानंतरच्या आठवडय़ात दररोज 3,500 पेक्षा अधिक रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.