पाचशे घरांचे स्थलांतर, पावसाची संततधार सुरूच
प्रतिनिधी/मिरज:
बुधवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाचा रात्रभर जोर सुरूच होता. गुरूवारी मध्यरात्री तीन वाजता मिरज ओढ्याला पूर आल्याने सुमारे पाचशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. ओढ्याचे पाणी पुलावरुन वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. नागरी वस्त्या, गुंठेवारी आणि विस्तारीत भागात कमरेएवढे पाणी साचले. त्यामुळे येथील नागरिकांचे तात्पूरते स्थलांतर करण्यात आले.
मिरज ओढ्याला पूर आल्याने मालगांव रोडवरील माळी कॉलनी, जनहित कॉलनी, इंदिरानगर, दिंडीवेस झोपडपट्टी, बोलवाड रोडवरील गुंठेवारी भागात पाणी शिरले. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरात पहाटे तीन वाजत अचानक कमरेऐवढे पाणी आल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काहींनी जनावरांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. मालगांव गावच्या हद्दीपर्यंत या ओढ्याचे पाणी पोहचले होते.