प्रतिनिधी/मिरज :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला मिरज शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातही स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळून सर्व गावे कडकडीत बंद ठेवण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लक्ष्मी मार्केट ते दत्त चौक परिसरात दोन दिवसांपूर्वी खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. आज मात्र या रस्त्यावर सन्नाटा पहायला मिळाला. लॉकडाऊनच्या नियमाला हरताळ फासून मोकाट फिरणाऱ्या हुल्लडबाजारांवर पोलिसांनी कारवाई केली.
सध्या जिह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्ण संख्येने हजाराचा आकडा ओलांडला आहे. दिवसेंदिवस नव्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. मिरज शहरातही कोरोनाने थैमान घातले असून, एकटया शहराची रुग्ण संख्या शंभरीकडे वाटचाल करीत आहे. कोरोनाने अनेकांचा बळी गेला आहे. तर शहराच्या बहुतांशी ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 23 ते 30 जुलै या कालावधीसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला शहराच्या सर्वच बाजार पेठांमध्ये नागरिकांच्या गर्दीचा महापूर आला होता. लक्ष्मी मार्केट ते दत्त चौक, गाडवे चौक आणि सराफ लाईन रस्त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे हे रस्ते सलग दोन दिवस नागरिकांनी गजबजून गेले होते. गुरूवारी सकाळपासून एकही नागरिक रस्त्यावर फिरकला नाही. ज्या रस्त्यांवर बाजार खरेदीसाठी काल-परवा प्रचंड गर्दी होती, त्या रस्त्यांवर आज सन्नाटा होता. दरम्यान, शहरासह ग्रामीण भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. मालगांव, बेडग, म्हैसाळ, खंडेराजूरी, सलगरे, मल्लेवाडी या गावातही बंद पाळण्यात आला.