आजतागायत एकही चोरटा हाती लागला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील गोसावी गल्ली येथे तीन लाखांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने महागड्या साड्या असा चार लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद संगीता नंदू गायकवाड ( वय 36) यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात दिली आहे.
कोल्हापूर रोडवरील गोसावी गल्ली येथे संगीता गायकवाड यांचे घर आहे. शुक्रवारी त्या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्या होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी आतील कपाटाचा दरवाजा फोडून त्यातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने तसेच महागड्या साड्या असा चार लाख, 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. असे संगीता गायकवाड यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे.
दरम्यान, शहर आणि परिसरात विशेष करून महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वीही दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मात्र आजतागायत एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी यात लक्ष घालून रात्रीच्या सुमारास पोलिस गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.