प्रतिनिधी / मिरज
शहरातील गोठण गल्लीत राहणाऱया सलीम बशीर भिलवडे (वय 29) या युवकाचा पाठलाग करुन कोयता, चाकूने भोसकून आणि दगडाने डोक्याचा चेंदामेंदा करुन निर्घृण खून करण्यात आला. गुरूवारी मध्यरात्री मालगाव रोडवरील कलावती मंदिराजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. पूर्ववैमनस्य, सावकारी आणि वर्चस्ववाद अशी बरीच कारणे या खुनामागे असल्याचे सांगण्यात आले. या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रात्री साडेआकराच्या सुमारास मयत सलीम बशीर भिलवडे (वय 29, रा. सिध्दार्थ चौक, गोठण गल्ली, मिरज) हा आपल्या ऍक्टीव्हा गाडीवरुन अमननगरहून मिरजेकडे येत होता. यावेळी अज्ञात इसमाने त्याच्या ऍक्टीव्हा गाडीला पाठीमागून वाहनाने धडकवून त्यास खाली पाडले. यावेळी या वाहनातील युवकांनी त्याच्यावर प्रथम कोयता आणि चाकूने हल्ला केला. भिलवडे रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्याच्या डोक्यात मोठे दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला. त्यामुळे तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पाचशे आणि दोनशे रुपये नोटांचे बंडल असे सुमारे 70 हजार रुपये पडल्याचे दिसून आले.
मिरज-मालगाव रोडवर भर रस्त्यावर पाठलाग करुन निर्घृण खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गील यांच्यासह पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या खुनाबाबत मयत भिलवडे याचा मित्र वासीम दिलावर मुल्ला याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, एजाज शेख (वय 22) आणि सुहेल नदाफ (वय 19, दोघेही रा. अमननगर, मिरज) या दोघांची संशयित आरोपी म्हणून नावे उघडकीस आली. घटना घडल्यानंतर दोघाही आरोपींनी मोटारसायकलीवरुन पलायन केले होते. त्यांना रात्री उशिरा कराड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
शहर पोलिसांनी सायंकाळी या दोघांना अटक केली. मयत समीर भिलवडे आणि आरोपी एजाज शेख व सुहेल नदाफ हे तिघे मित्र होते. सहा महिन्यांपासून यांच्यात वाद निर्माण झाला होता. सावकारी, वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. कोयत्याने हल्ला केल्यानंतर चाकूने पाठीत भोसकण्यात आले होते. त्यानंतर भिलवडे खाली कोसळताच त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. याबाबत मयत सलीम भिलवडे याचा मामा दस्तगीर महंमदहनिफ कलंगडे (वय 46, रा. चाँद कॉलनी, पाचवी गल्ली, मिरज) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. मयत सलीम भिलवडे आणि आरोपी एजाज शेख या दोघांवर 2016 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. हे दोघेही सध्या जामिनावर बाहेर होते. पुढील तपास सपोनि वर्धने करीत आहेत.