प्रतिनिधी / मिरज
दोन व्यापाऱ्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून झालेल्या इर्षेपोटी एका कांदा व्यापाऱ्याने रविवारी आपल्याकडील कांद्याची अवघ्या दोन रूपयांना विक्री केली. एकीकडे कांदा महागला असताना अत्यंत कमी दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दिवसभर या घटनेची शहरात चर्चा होती.
सध्या कांदा महागला आहे. प्रतिकिलो 40 ते 60 रूपयांपर्यंत कांद्याचा भाव आहे. त्यामुळे ग्राहक काटकसरीने कांदा वापरत आहेत. कांद्याचा हा दर वाढला असताना मिरजेत मात्र, रविवारी हाच कांदा अवघ्या दोन रूपयांना विकला गेला. लोणी बाजारात दोन कांदा विक्रेत्यांमध्ये कांद्याच्या दरावरून भांडण झाले. सदरचे दोघे विक्रेते टोमॅटोही विकत होते. त्यापैकी एकाने अगदी नगण्य किंमतीला टोमॅटो विकून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुसरा व्यापारी चिडला. त्याने आपल्याजवळील कांद्याचे भाव अगदी कमी केले. दोन रूपये प्रति किलो अशा दराने त्याने कांदा विकण्यास सुरूवात केली. भर बाजारात ओरडत त्याने ही विक्री सुरू केली.
अवघा दोन रूपयांत कांदा मिळत असल्याची वार्ता हाहाः म्हणता साऱ्या शहरात पसरली. त्यामुळे या विक्रेत्याकडे खरेदीसाठी झुंबड उडाली. मोठी गर्दी झाल्याने वाहतूकीची कोंडी झाली. यावेळी वाहतूक पोलीसांना पाचारण करावे लागले. त्यांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहक कांद्यावर तुटून पडले होते. अवघ्या काही तासातच सुमारे दोन टन कांदा विकला गेला. दोन विक्रेत्याच्या मध्ये निर्माण झाल्याने स्पर्धेतून ग्राहकांच्या पदरी अत्यंत कमी किंमतीत कांदा पडला. दिवसभर या घटनेची चर्चा शहरात होती.