जीवित वा वित्तहानी नाही, कचऱ्याने पेट घेतल्याने लागली आग
प्रतिनिधी/मिरज
शहरातील रेवणी गल्ली येथील शासकीय गोदमात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामात पडलेला कचरा पेटला होता. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. गोदाम पूर्णतः रिकामे असल्याने जिवीत वा कोणतीही वित्त हानी झाली नाही. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
दरम्यान, शासकीय गोदामाला लागूनच अनेक घरे आहेत. या घरांमध्ये गॅस सिलिंडर होते. गोडाऊनमध्ये आग लागल्याचे समजताच अनेक नागरिकांनी सतर्कता दाखवत घरातील सिलेंडर टाक्या बाजूला सारल्या. व नागरिक घरातून बाहेर आले. अगदी किरकोळ आग लागली होती. मात्र, धुराचा लोट मोठ्या प्रमाणात पसरला होता.
रेवणी गल्लीतील शासकीय गोदाम गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना दुर्लक्षित राहिले आहे. पूर्वी या गोदामात शासकीय तंत्र निकेतन मतिमंद व गतिमंद मुलांची शाळा भरायची. मात्र सदर शाळाही गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने सदर गोदाम वापराविना आहे. मात्र, नागरिकांनी त्याचा कचरा कोंडाळा केला आहे. त्यामुळे आगी सारख्या घटना घडत आहेत. नागरिकांनी येथे कचरा टाकू नये, असे आवाहन अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी केले आहे.