प्रतिनिधी / मिरज
मनपा मिरज विभागीय कार्यालयातील स्वच्छता कर्मचारी प्रशांत परशुराम ढाले (वय 45, रा. वैरण बाजार, मिरज) यांचा गुरूवारी कामावर कार्यरत असताना अचानक मृत्यू झाला. कामावर असताना मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असून, यामुळे कर्मचाऱयात खळबळ उडाली. स्वच्छता अभियानामुळे कामाचा ताण वाढल्याने ढाले या कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्याचा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला. मनपा कर्मचारी संघटनेनेही याप्रकरणी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.
शहरातील महात्मा पुले कॉलनीत राहणारे प्रशांत ढाले हे मिरज विभागीय कार्यालयाकडे स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गुरूवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे प्रभाग पाचमध्ये मालगाव रोडवर स्वच्छतेसाठी गेले होते. ते कामावर असताना चक्कर आल्याने ते खाली पडले. इतर कर्मचाऱयांनी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, रुग्णालयाने प्रशांत ढाले मृत झाल्याचे घोषित केले. घडल्या प्रकारामुळे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱयात एकच खळबळ उडाली होती. आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह अनेक अधिकारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले होते.
घडल्या प्रकारामुळे ढाले यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाल्याने महिलांना मोठा आक्रोष सुरू केला होता. कर्मचाऱयांसह बघ्यांचीही मोठी गर्दी रुग्णालयात झाली होती. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली. उपायुक्त सौ. स्मृती पाटील याही रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. प्रारंभी ढाले यांचे नातेवाईक आक्रमक होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
सध्या मनपा क्षेत्रात स्वच्छता सर्व्हेक्षण अ†िभयान 2020 युध्द पातळीवर राबविले जात आहे. यासाठी स्वच्छता कर्मचाऱयांवर मोठय़ा कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मुकादम आणि स्वच्छता निरीक्षकांकडून अशा कर्मचाऱयांना नाहक त्रास दिला जातो. त्यातूनच प्रशांत ढाले या कर्मचाऱयाचा बळी गेला असल्याचा आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी यावेळी केला. एक महिन्यांपूर्वी उत्तम पांढरे या कर्मचाऱयाचा बळी गेला होता. आज मनपाने स्वच्छतेच्या नावाखाली दुसरा बळी घेतला असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.
प्रशासनाकडून स्वच्छता कर्मचाऱयाचा एक रुपयांचाही विमा उतरविला गेला नाही. त्यांच्यासाठी आकस्मित निधीची तरतूद नाही. शिवाय या कर्मचाऱयांना थमची सक्ती आहे. पण, अधिकाऱयांना मात्र ती नाही. यांची ऑनलाईन हजेरी घेतली जाते. काम करत असलेल्या ठिकाणचे फोटो घेतले जातात. त्यामुळे या तणावातून कर्मचाऱयांचे बळी जात आहेत, असे डॉ. महेशकुमार कांबळे म्हणाले. एक महिन्यात दोन कर्मचाऱयांचे बळी गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी. ती न दिल्यास मनपा मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याबरोबर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉ. कांबळे यांनी यावेळी दिला.
मनपा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांनीही घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवित याबाबत ठोस कारवाई न झाल्यास स्वच्छता कामावरच संघटना बहिष्कार घालेल, असा इशारा दिला. प्रशासनाकडून स्वच्छतेचे आदेश दिले जातात. पण, आवश्यक साहित्य दिले जात नाही, असाही त्यांचा आरोप होता. आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी घडलेली घटना अतिशय दुःखद असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची दखल घेतली जाईल, अशी हमी दिली. मयत प्रशांत ढाले यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
अनुदानासाठी धावपळ
सध्या राज्यभर स्वच्छता सर्व्हेक्षण अभियान 2020 युध्द पातळीवर राबविले जात आहे. या अभियानात आपल्या मनपाचा नंबर येऊन घसघशीत अनुदान मिळावे, यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. याचा ताण मात्र स्वच्छता कर्मचाऱयांवर पडत आहे. 50 कर्मचाऱयांचे काम 20 कर्मचाऱयांवर लादले जात आहे. या कामाच्या तणावामुळेच एका महिन्यात दोन कर्मचाऱयांचे बळी गेले असल्याचा आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी यावेळी केला.