प्रतिनिधी / मिरज
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे दिड किलोमीटर रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वेने तातडीने पुन्हा भराव टाकून रेल्वे मार्ग दुरुस्त केला. मात्र, दुरुस्त केलेला रेल्वेमार्ग पुन्हा खचल्याने मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.
बुधवारी मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे मार्ग खचल्याने हातकणंगले येथे थांबवण्यात आली. दोन तासात तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे मार्ग दुरुस्त करून ही गाडी कोल्हापूरला रवाना झाली. मात्र, या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली असून, कोल्हापूरातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या मिरजेतून सोडण्यात येत आहेत. तर कोल्हापूर पर्यंत येणाऱ्या गाड्या मिरजेत थांबविण्यात येत आहेत.
बुधवारी धावणारी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री साडेनऊ वाजता मिरज स्थानकात आली. परंतु ही गाडी पुढे रवाना झाली नाही. गाडी पुढे रवाना न झाल्यामुळे रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यानंतर पहाटे कोणत्याही सुचनेशिवाय महालक्ष्मी एक्सप्रेस मिरज स्थानकातून मुंबईकडे रवाना करण्यात आली.