नांद्रे पुलाचा भराव वाहून गेल्याने निर्णय, काही गाड्या कुर्डूवाडी मार्गे वळविल्या
प्रतिनिधी / मिरज
चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने वसगडे – नांद्रे दरम्यान असलेल्या रेल्वेच्या ओव्हर ब्रिजचा भराव वाहून गेल्याने कोल्हापूर – पुणे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. कोयना, महाराष्ट्र एक्सप्रेससह मालगाड्याची वाहतूक रद्द करण्यात आली. तर वास्को निजामुद्दीन सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी मार्गे वळविण्यात येणार आहेत. भरावाच्या दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू होते.
गेली चार दिवस दक्षिण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्या, ओढे, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. कोल्हापूर ते पुणे रेल्वे मार्गावरील नद्या, नाल्यांनाही पूर आला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने रेल्वे सेवे वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यातच मिरज ते सातारा मार्गावर वसगडे-नांद्रे जवळ असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाण्याचा मोठा साठा होऊन पाणी ओव्हर फ्लो होऊन ते वेगाने बाहेर पडले.
त्यामुळे याठिकाणी असणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या कोयना, महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. तर गोवा, निजामुद्दीन एक्सप्रेससह अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी मार्गे वळविण्यात आल्या. मालगाड्यांची वाहतूकही थांबविण्यात आली आहे. पुलाच्या दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.