गारांचा मारा, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
वार्ताहर / खंडेराजुरी
अवकाळी पावसामुळे मिरज पूर्व भागासह सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्वभागातील द्राक्ष बागायतदार पुरता कोलमडून पडला आहे. हाता तोंडाला आलेले पीक प्रचंड पावसामुळे मातीमोल बनले आहे. मिरज, कवठेमंकाळ, जत, तासगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यासह सोलापूर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अर्थवाहिनी बनलेले द्राक्षपिक अवेळी गारपीटसह पडलेल्या पावसामुळे डोळ्यादेखत संपून जात आहे.
द्राक्ष बाग छाटणी नंतर बारा ते पंधरा दिवसात पोंगा स्टेज, 35 ते 40 दिवसात फ्लॉवरिंग स्टेज व 100 ते 120 व्या दिवशी गोडवा धरायच्या वेळेलाच पाऊस पडला तर डोळ्यादेखत दिसणारे द्राक्ष पिक मातीमोल झाली. द्राक्ष पिकाला इतके प्रचंड पाणी झाले आहे, की झाडाच्या खोडाला टोच्या मारला तरी त्यातून पाणी बाहेर येत आहे, विक्रीसाठी आलेल्या द्राक्षबागा अवेळी पडलेल्या पावसामुळे द्राक्षे तुटून खाली पडत आहेत. तर काही बागा ओझ्यामुळे कोसळत आहेत. द्राक्ष बाग वाचवण्यासाठी हजारो रुपयांची महागडी औषध फवारून सुद्धा सततच्या पावसामुळे बागेवर औषध मारणे ही मुश्कील झाले आहे. दावण्या, करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फ्लोरिंग मधील बागाची फुलकळी झडते तर विक्रीसाठी आलेल्या द्राक्षामध्ये पाणी धरलं तर कुजवा होतो.
मिरज पूर्वभाग सह दुष्काळी द्राक्ष पट्ट्यामध्ये इतका प्रचंड पाऊस झाला आहे की, अनेक ठिकाणी ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत, रस्त्यावर वाहने जाणार नाहीत इतके पाणी भरले आहे, द्राक्ष बागेत औषध मारणेस ही जाता येत नाही इतके पाणी साचले आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे द्राक्ष मणी फुटुन प्रचंड नुकसान झाले आहे.