प्रतिनिधी / बेळगाव :
मिरज येथील नवरत्न परिवार व राजेश्री शब्दविष्कार यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या कवी संमेलनात बेळगावच्या सतरा कवींनी सहभाग नोंदवून आपल्या एकापेक्षा एक विविध विषयांवरच्या कविता सादर करून उपस्थित काव्यरसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित होते. तसेच व्यासपीठावर कुरुंदवाडचे ज्ये÷ कवी दिलीप कुलकर्णी व नवरत्न परिवार आणि साई प्रकाशनाचे संस्थापक प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी कवी अशोक सुतार यांनी ‘आपलं बेळगाव’ ही कविता सादर करून काव्य मैफिलीस सुरुवात केली. त्यानंतर डॉ. प्रेमा मेणशी यांनी ‘दुरुस्ती’, स्मिता किल्लेकर यांनी ‘झिम्माड पाऊस’, निकिता भडकुंबे यांनी ‘जन्म’, संदीप मुतगेकर यांनी ‘माझी गावाकडची शाळा’, रोशनी हुंदे ‘अजूनही यौवनात मी’, अस्मिता आळतेकर यांनी ‘महापूर’, भरत गावडे यांनी ‘शोकसभा’ आदींसहीत विविध कविता सादर केल्या.
त्याचबरोबर कवी मधु पाटील, चंद्रशेखर गायकवाड, किरण पाटील, विजया उरणकर, विश्वनाथ मुरगोडी, भरमा कोलेकर, आर. के. ठाकुर देसाई यांनीही आपल्या स्वरचित दर्जेदार कविता सादर करून येथील काव्यरसिकांची दाद मिळविली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कवींचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.